Thursday, May 26, 2011

माझी पहिली प्रस्तावना

प्रस्तावना या शब्दाबद्दल मला लहानपणापासूनच विलक्षण कुतूहल आहे. कोणत्याही पुस्तकातील म्याटर वाचण्यापेक्षा मला त्याची प्रस्तावना वाचण्यासाठीच जास्त वेळ लागतो. किंबहुना प्रस्तावना वाचल्यानंतर माझा स्ट्यामिना, पेशन्स, विवेक, कुणीतरी डोस दिल्यानंतर पुस्तक मिळवून (बहुधा फुकटचे) वाचनाला सुरुवात करण्याचा उत्साह (एक पुस्तक वाचण्याची सुरुवात मी खूप वेळा करतो) किंवा आकलनशक्ती (जी महत्त्वाच्या वेळी हमखास दगा देते) यांपैकी काही तरी संपते. मग ते पुस्तक मला व मी पुस्तकाला 'गांधीगिरीने' समझोता करून त्रास देण्याचे टाळतो. "शो मस्ट गो ऑन" या कोण्या महापुरुषाने म्हटलेल्या उक्तीप्रमाणे मी नेहमीचे काम ("तुला काय काम असते" असा टोमणा मारून माझे मित्र त्यांचे जे काम मला देतात ते) करत राहतो, किंवा नवीन पुस्तकाची सुरुवात करतो. ते पुस्तकही (सोडलेले) आजोबांच्या बुक शेल्फ मध्ये मोठ्या डौलाने उभे असते. मग मित्राचा रागारागाने ते रिटर्न करण्यासाठी फोन आल्याशिवाय मला त्याची आठवण होत नाही. तर मुद्दा असा की प्रस्तावना हा माझा जिव्हाळ्याचा विषय. 'इलेक्ट्रोमॅग्नेटीक्स'च्या पुस्तकाच्या प्रस्तावनेचे परीक्षण करण्यातच सारा वेळ गेल्यामुळे माझा पहिला धडा सुरू करायचेच राहून गेले. त्यामुळे महत्प्रयासांनी (आणि पुणे विद्यापीठाच्या कृपेने) आतापर्यंत कशीबशी टाळलेली ए.टी.के.टी. अखेर मला बसलीच; याचे एकमेव कारण म्हणजे प्रस्तावना असे एक्स्पर्ट ओपिनिअन पडले (या एक्स्पर्ट पॅनल मध्ये मी व माझा के.टी. लागलेला दुसरा मित्र होतो.). पण मला त्याचा खेद नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे प्रस्तावना हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.

"स्वप्ने पहा" अशी शिकवण आपल्या पपू राष्ट्रपतींनी दिली आहे. लहानपणापासून अनेक स्वप्ने पाहिली. (आईच्या म्हणण्यानुसार त्यांना दिवास्वप्ने म्हणतात. परंतु चार अक्षरे लिहिण्यापेक्षा दोन अक्षरे लिहून आशय काळात असेल तर उगीच शाई का वाया घालावा? गेल्या चार परीक्षा व त्यांच्यामधल्या मिड-सेम एक्झाम्सना मिळून ही करंट रिफील पुरली असली तरी आता ती संपत आली आहे.) त्यातली काही स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत, तर बाकीच्यांचा मी नाद सोडून दिला. पण माझं एक जुनं स्वप्न की 'भले कादंबऱ्या, नाटके, कथा, कविता, व्यक्तीचित्रे अथवा प्रवासवर्णने लिहिता आली नाहीत तरी बेहत्तर, पण आयुष्यात एखादीतरी प्रस्तावना लिहिल्याशिवाय राहणार नाही. (कशाची ते अजून डीसाईड झालं नाही.)' पूर्ण करण्याचं मी तडकाफडकीने ठरवलं आहे. त्याला कारणंही तशीच आहेत.

अॅचिव्हमेंट्स, स्कॉलरशिप्स या सदरामध्ये (आता इंजीनियरिंगचे शेवटचे वर्ष आहे. नोकरीचे वेध लागलेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी बायोडाटा या प्रकारात स्वतःचे कौतुक प्रस्तुत सदराखाली करायचे असते. असो.) इयत्ता चौथीला केलेले वृक्षारोपण (त्यासाठी नाश्ता फ्री मिळणार होता. शिवाय शाळाही चुकणार होती.) आणि इयत्ता नववीला क्रांतिदिनाच्या दिवशी काढलेली प्रभात फेरी (ती रविवारी व पहाटे आठ वाजता असली तरी कंपल्सरी होती.) याखेरीज अथक परिश्रमांनंतरही काहीच बसले नाही. त्या सेक्शनमध्ये अॅडीशन करण्यास मी डेस्परेट आहे. (एक)
मिस. मधूला प्रपोज केल्यानंतर "ठरवलेली एक साधी गोष्ट करता येत नाही तर लग्नानंतर काय करणार? एनी वे, मी दुर्लक्षितांना पोसायचा मक्ता घेतला नाही." असे उत्तर देऊन नाकावर टिच्चून ती परागबरोबर निघून गेली व माझ्या निजलेल्या स्वाभिमानाने उचल खाल्ली. (दोन)
दुखावलेला स्वाभिमान हा जरी एक मोटिव्हेशन फॅक्टर असला तरी प्रस्तावना आत्ताच लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे सुरुवात न झालेल्या प्रोजेक्टचा प्रोजेक्ट रिपोर्ट दोन दिवसांत सबमिट करायचा आहे, आणि अशा क्रीटीकल वेळीच माणसाला किडे करायची हुक्की येते. (तीन)

तर मराठी वांङ्मयात अनमोल भर टाकण्याचे पवित्र कार्य हाती घेताना मी इन्स्पिरेशन सोर्स म्हणून पुलंचं गोळाबेरीज पॅडखाली घेतलं आहे. कोण जाणे एखाद्या सहृद प्रकाशकाने उद्या मानवतेच्या भावनेतून (किंवा वशिल्याने) माझे पुस्तक छापायचं ठरवलं तर प्रस्तावानेपासून तयारी करायला नको! (तशीही माझ्या पुस्तकाला माझ्याशिवाय कोण प्रस्तावना लिहिणार म्हणा. मीच नाव बदलून लिहीन म्हणतोय.) तूर्तास उत्तम प्रस्तावना देऊन प्रकाशकावर इम्प्रेशन कसे मारावे, शितावरून भाताची तशी प्रस्तावनेवरून पुस्तकाची परीक्षा कशी करावी ह्या टॉपिक्सना हात घालत नाही. (अन्यथा माझ्या पुस्तकातला एक चाप्टर फुकटचा कमी होईल.)

आणखी एक मला पडलेला यक्षप्रश्न म्हणजे कोणत्या नावाने लेखन करावे? एकटाच असल्यामुळे 'आग्रज' किंवा 'अनुज'ने संपणारी नावे ऑलरेडी बाद होतात. शिवाय बाबांनी मला वेळच्या वेळी मारून सुतासारखं सरळ केल्याने सुताने संपणारं नाव वापरण्याचं धाडस होत नाही. त्यामुळे 'केशवसुत'सम नावेही बाद होतात. मित्रांमधले माझे टोपणनाव पब्लिकली डिक्लेअर करण्यासारखं गोंडस नाही. म्हणून तूर्तास पाळण्यातल्या नावानेच लिहित आहे. (खरं सांगायचं तर दुसरं सुचलंच नाही.) आपल्या सूचना व प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत. स्तुतीपर प्रतिक्रिया भावी पुस्तकात छापून आणण्याची मी हमी देत आहे. स्तुती करणाऱ्या लकी वाचकाला पुस्तकाची एक प्रत फ्री मिळेल याची ग्वाही देतो आणि प्रस्तावना सुरू करतो.

लोभ असावा.

आपला नम्र,

निखिल अनिल जोशी
८-१०-२००६
पुणे

Thursday, May 19, 2011

गर्वहरण

कालपटाच्या पत्रिकेत आज शनी दाटला होता
आजचा दिवस जरा ग्रीष्माने ग्रासला होता

का कोणास ठाऊक,
पण पहाटेचा प्रसन्न भास्कर आज जरा जास्तच गडद दिसला होता
इतक्या दिवसांचा अहंकार का वळीवाच्या चाहूलीने त्रासला होता?

त्याला वेळेचेही भान नव्हते, अन् दयेला तर मुळीच स्थान नव्हते
रक्ताचा श्वेत अन् श्वेताचा पीत कधी झाला ते कळलेच नाही
सर्वांना तडपवताना स्वतःही जळतोय हे तर त्याला वळलेच नाही

धरादेखील त्याच्या ह्या वागण्याने त्रस्त होत होती
रक्ताला जागून मात्र त्याच्याबरोबर हतबलपणे तप्त होत होती

पण त्याला त्याची पर्वा नव्हती, त्याचे पित्त खवळले होते
गर्वाने मान काढली होती, अन् अहंकारी रक्त उसळले होते

कवितेत शोभणारे त्याचे प्रखर तेज आता 'काटे'कोरपणे टोचू लागले होते
क्षणागणिक वाढणारे त्याचे भीषण तांडव बेधुंद होऊन नाचू लागले होते

नारायणच जर उग्र असे तर व्यथा कुणाला सांगावी?
बिथरलेल्या मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधावी?

...

कोण जाणे क्षितीजातून ते दैवी ढग कसे आले
धगधगत्या त्या बाणांचे मग क्षणात कवडसे कसे झाले?

मेघांतून जलधाराही झिरपू लागल्या, दोघांचे अहंकार एकमेकांना भेटले
क्षणभर इंद्रधनुष्याचा भास, नंतर मात्र धर्मयुद्ध पेटले

अहो अस्तित्वाची लढाई ती, मागे कुणीच सरेना
त्यांचा सुरू झाला लपंडाव, बिचाऱ्या नभाला मात्र वाली मिळेना

इतका वेळ दबा धरून बसलेली चपला गर्जना करीत मेघाला मिळाली
संध्याकाळच्या सूर्याच्या ओसरत्या तेजाचीही आयतीच मदत त्याला झाली

मेघाची सरशी मान्य करण्याखेरीज सूर्याकडे काही गत्यंतरच नव्हते
पांढरं निशाण दाखवावं तर ढगांमध्येही अंतर नव्हते

.......

एका यःकश्चित सायंकाळी निसर्गाला अशी महाकाव्ये स्फुरतात
भल्याभल्या महाभूतांचीही तेंव्हा सहज गर्वहरणे घडतात


-निखिल अनिल जोशी
२००६
पुणे

कोप

आयुष्याच्या माझ्या रणि, सर्व पापांचा मी धनी
कधी काही होते माझे, आता फक्त आठवण

बेभान हा धुंद वारा, वादळाचा हा नजारा
धन गेले मन मेले, नुरे आशेचा किरण

भूकंपाचा अनुकंपा, विनाशाचा वाजे डंका
वाट झाली वाकडी नि रेंगाळले दोन क्षण

त्सुनामीची उंच झेप, निसर्गाचा हा उद्रेक
शान मातीमोल झाली, जीव फिरे रानरान

निसर्गाचा कोप झाला, आयुष्यावर रोष झाला
चूल मूल सर्व गेले, भटकंती वणवण

कोणाविन कोण अडे, रोज मरे कोण रडे
आता नाही घरदार, शोधतो विसावा पण


-निखिल अनिल जोशी
१६-०३-२००५
पुणे