Monday, November 14, 2011

गुंड्या आणि बंड्या



यक कुटुंब व्हतं भलं
घरामंदि सुख त्यांच्या खेळं
सोसुनी भुकेची झळं
केलं कष्ट चाखाया फळं
कष्टाचि मिळाली फळं
लवकरच झालं अन् जुळं
(यक गुंड्या नि यक बंड्या)
गुंड्या शाणं, बंड्या खुळं
गुंड्या चिकनं गोरंपान
बंड्या कुळकुळीत हो काळं
(त्यांच्या आईला प्रश्न पडला)
द्येवा असं कसं हो झालं?


(दोघं साळंला जाऊ लागले)
गुंड्या हुश्शार आनी न्येकं
वर्गामंदी नंबर येकं
बंड्या कसा करंटा लेकं
परिक्षेत फ्रॉड अन् फेकं
गुरुजी म्हणाले 'इनफ'
काढले जालीम औषध येकं
आधि दिला छड्यांचा शेकं
मग म्हणाले 'गिव्ह हिमं ब्रेकं'

गुंड्या येळीच म्याट्रिक झालं
बंड्या किती किती व्हं ढकललं
सातव्या यत्तेस असं चिकटलं
ह्याच्यापरीस फेविकॉल बरं
(गुरुजींना प्रश्न पडला)
द्येवा असं कसं हो झालं?


गुंड्या कालेजात जाई
बंड्या गल्लीमधला भाई
अशी वरसं गेले काही
गुंड्या पोलीस खात्यात इन
बंड्या हप्ता अन् स्मगलिंग
गुंड्या पराक्रम नवनवा
आनि बंड्या........
नवनव्या जेलांची हवा


येके दिवशी चिमित्कार झाला
घरामंदी फोन वाजला
हिकडं आयेनं फोन उचलला
पलिकडून आवाज आला
तोऱ्यात बाबू बोलला
'तुमचा बंड्या मंत्री झाला नि गुंड्या शिक्यूरिटी'
आज बंड्या ऐटीत चालं नि गुंड्या शेपटी
हाच जगाचा न्याव असे हो द्येवा, जि रं दाजि रं जी जी, रं जी जी जी जी हो!



(आय.आय.टी. कानपूरमधील महाराष्ट्र मंडळाच्या 'प्रतिबिंब' या २००९ साली झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हा परफॉर्मन्स केला होता.)



    - निखिल अनिल जोशी
   १४ जानेवारी २००९
   कानपूर

Sunday, November 6, 2011

घरटे


धडपडणारे चार हात
पाउस-वारा-अंधारातहि
प्रकाशलेली अंतर्वात

चार डोळे एक दृष्टी
सुंदर बनवू आपुली सृष्टी

एकेक वीट रचत रचत
चौतीस वर्षे पडत उठत
भातुकलीचे इवले घरटे
आज जाहले उदंड मोठे



घरट्यामध्ये राजा-राणी
अखंड उत्साही सहकारी
सहकाऱ्यांची छोटी गावे
गावामधल्या हतबल स्त्रिया
सोशित ज्वाळा स्त्रीरोगाच्या
लाथा दारूड्या नवऱ्याच्या
व्यसनाधीन जरी हे नवरे
आपुले दुखणे आपुले चेहरे

जगण्यासाठी लढता लढता
बालपणातच थकले बाळ
जगले तर त्याच्या वाटेवर
पौगंडात निसरडी साल

दूरदेशिच्या रानामध्ये
आजारांशी झुंजत झुंजत
दारूसंगे झिंगत झिंगत
समस्यांची खोदत खाण
साधेभोळे आदीवासी
कवडीमोल तयांचे प्राण

गोंधळलेली बावरलेली
प्रवाहासवे आदळुन आपटुन
आता थोडे सावरलेली
तरुणाई शोधत वाटा
चाकोरिस देउन फाटा



हे घरटे तर भरले गोकुळ
सर्वांचे अपुलेसे गोटुल
भव्यता नसे जिथे दिव्यता
माणूस जपणे हीच धन्यता

माणुस येथे कणाकणातुन
सर्व थरातुन सर्व कुळातुन
जो पिचलेला वा खचलेला
विठ्ठल तो सेवेस भुकेला

चौतिस वर्षे या घरट्याची
जित्या-जागत्या इतिहासाची
आणखी चौतिस घडो साधना
ईश्वरचरणी हीच प्रार्थना.


(ही कविता अम्मा-नायानांच्या लग्नाच्या चौतिसाव्या वाढदिवसानिमित्त केली आहे.)

  • निखिल अनिल जोशी
    गडचिरोली
    २ नोव्हेंबर, २०११