Sunday, November 15, 2009

या शब्दांनो, परत फिरा रे

कधी द्यायचे शब्द साथ मज, ऊन्ह-पावसा दरिशिखरातून
आज गिळाया उठले आहे एकाकीपण क्षणाक्षणातून

खिन्न होतसे तेव्हाही मी, अडकत धडकत जगत असे
कधी झुल्यातुन उंच ढगांवर, खोल कधी मी पडत असे
नसे शाश्वती जरी यशाची, पराजयाने मी न खचे
नसे निश्चिती मज मार्गाची, वहीवाटेहुन वळण रुचे

प्रवास माझा ऐसा होता, हर्षामधुनी गाणी झरली
डोळ्यांमध्ये दाटे पाणी, कविता तेव्हा खरी बहरली
पाहुन डोळे ओले धावे, सरस्वती अश्रूंस पुसाया
उदार होउन उधार देई, शब्द कवीतेतुन गुंफाया
क्षणात गाणे स्फुरे व्यथांचे, षड्ज नवेल्या चैतन्यातून
निर्माल्यातून कळी फुले मग, पर्ण पल्लवित पाचोळ्यातून

तिमीर दाटता दाहि दिशांनी, जिथे साथ सावली सोडते
तिथे माउलीपरी जिव्हाळा, सखे शब्द मज लावत होते
आनंदाच्या समयी क्षणभर मी न विसरलो त्यांना तेव्हा
दुःखी अन् एकाकी मज नच कधी सोडले त्यांनी तेव्हा


आज 'यशस्वी' होण्यासाठी शब्द सोडले, विचार धरला
कल्पनेतला विहार सोडून, बुद्धीवादी प्रवाह धरला
सळसळणारे भाव टाकुनी पोसत आहे हिशोब सारे
कसे जगावे स्वच्छंदी, जर भावबुद्धी हे विजोड वारे

गार्दीमध्ये मित्र हरवले, डाव खेळले फसले आहेत
आज भूताचा मार्ग काढता, शब्द मजवरी रूसले आहेत
यशस्वीता घ्या शब्दांनो, पण मनस्वीता मज परत करा रे
क्षयअक्षय्यामधली सीमा, पुन्हा एकदा ठळक करा रे


- निखिल अनिल जोशी
२८-१०-२००९
हैदराबाद

Tuesday, April 14, 2009

पहाटधारा




कोऱ्या नभात माझ्या, तो कृष्णमेघ शिरला
सचैल मनातून भिजलो, मन श्रीमंत मग वाटले

कोण्या पहाटरात्री गेली दरवळोनि रातराणी
इतुके भरुन आले, नयनी दवबिंदु दाटले

नभी मेघ पिंजलेले, मृद् गंध दाटलेला
पर्जन्य स्वागतासी, स्वर्गात देव नटले

ते बिंब उगवता लाल, स्वच्छंद घनांच्या मागे
मेघांतुनी कवडसे जणु अंकूर बिजांतुनि फुटले

अतृप्त पाहता माती, संपृक्त जाहले मेघ
गुंफून ठेवलेले, मोती अखेर तुटले

ते इंद्र्धनुष लोभस, राजस न रंग त्याचे
वेड्या नभावरी मग, ते ॠण धरेचे फिटले

ती गोड भैरवी होती, मल्हार बरसला त्यात
शून्यात मी बुडालो, डोळे क्षणात मिटले


-निखिल अनिल जोशी

Friday, March 6, 2009

एक थेंब पाण्याचा



एक थेंब पाण्याचा

जो सामावून घेतो, हळुवारपणे सूर्याचा एक किरण

अन क्षितिजावर उधळतोइंद्रधनुचे सात  सुंदर रंग


एक थेंब पाण्याचा

कधी उमलतो दवबिंदुच्या रूपात, मावळणाऱ्या फुलावर

आणि हलकेच झाकून टाकतो पिकल्या पाकळीचे व्यंग

 

एक थेंब पाण्याचा

टपकतो एखाद्या निश्चलशा तळ्यात, घेऊनि घनांचा संदेश 

तेंव्हा उठतात त्याच्याही नीरस चाकोरीत, चैतन्याचे हरवलेले  तरंग

 

एक थेंब पाण्याचा

कधी तरळतो नकळत, पडद्याशी डोळ्यांच्या

आणि अलगदपणे उलगडतो साऱ्या भावपटाचे अंतरंग

 

  -निखिल अनिल जोशी

Wednesday, January 21, 2009

माझे गाणे

वर्षं सरली एक वीस
अजुनही नकळतच जातो दीस


बोललंच नाही कधी कोणी
तर बोलतात पक्षी, फुले, पाने
आणि स्वतःशीच बोललो कधी
तर आपोआप तयार होते गाणे
ओठांवरचे गाणे
भावुकपणे गात जातो
अन प्रारब्धाचा घास
आपसूकच खात जातो

प्रत्येकाचा घास ठरलेला
प्रत्येकाची ओंजळही ठरलेली
दाणे किती आणि खडे किती
यांची गणितेही ठरलेली
किती घ्यायचं आणि किती सांडायचं
याची वजाबाकी प्रत्येकाने ठरवायची असते
आणि सुरुवातीला काठोकाठ भरलेली ओंजळ
आयुष्यभर पुरवायची असते


वर्षं सरली एक वीस
अजुनही नकळतच जातो दीस

उमलणारी फुले आणि बागडणारी मुले
डुलणारी कणसे आणि गुंजणारा वारा
उडणारे पाखरू अन ढगांचा पिसारा
स्फुरणारी गीते अन फुलणारी स्मिते
हेच माझे धन मग हात जरी रिते


-निखिल अनिल जोशी
२१-०१-२००९

काळ आला होता पण...

प्रसंग तसा बाका होता, वातावरण तप्त होते
शांततेची चिन्हे दिसेनात, एकसतत आक्रमण सुरू होते
घड्याळाचे का काटे रुतले होते? वेळच पुढे सरकेना
आम्हा दीनांचा तो कैवारी, धावा करुनही येईना

आदल्या जन्मीचा सूड की या जन्मीची परीक्षा होती?
प्रसंगाची काठिण्यपातळी exponentially वाढतच होती
अखेर आमचा धावा ऐकून तो शांतिदूत ठणाणा करित आला
पाचची बेल झाली न आक्रमक "काही झालेच नाही" या अविर्भावात वर्गातून निघुन गेला

-निखिल अनिल जोशी

Thursday, January 1, 2009

भिंगरीचं आत्मवृत्त

घरघर भिरभिर अनंत वळणे
स्वतःभोवती घेऊन पडणे
घेता फिरकी हर्ष फुलावा
निश्चित जरी मग अडखळणे

फिरण्याचा मज गर्व नसावा
पडण्याचा अन खेद नसावा
सुंदर इतुके जीवन माझे
मरण्यालाही अर्थ नसावा

देवाघरल्या फुलांस रंजन
वाऱ्याचे ते अवीट गुंजन
आणिक नाही आकांक्षा मज
माझी मजला फुले निरंजन

धनिक निर्धन मज ना ठावे
कुणी न उजवे कुणी न डावे
निर्भय भरभर गिरगिर फिरुनी
प्रेम तयांचे परत करावे

मातीशी हे अतूट नाते
स्वार हवेवर होऊन वाटे
पर्वत मजला खुजा दिसावा
अवघे नभ अन मुठीत दाटे

काळ उलटला तपेन सरली
पुलाखालुनी बरेच पाणी
वाहूनि गेले; आता अडगळ
धुलिकण माझे सखे सोबती

अधूरी धूसरशी स्मृतिचित्रे
मनी दीवण्या जुळून येती
इच्छांचे या चिंतन करता
अश्रूंचे बंधारे फुटती

हाती कुणी मज अलगद उचलूनि
श्वास मोकळे परत करावे
झटकुनी विश्वाचि ही मरगळ
स्वच्छंदी अन मुक्त फिरावे


-निखिल अनिल जोशी