Monday, February 28, 2011

भिंत

मिळण्यासि ज्ञानसागरा, माझी नदी निघाली
अडलीस का बिचारे, धरणात तू अकाली

तुज गर्व 'जरि अडखळले, खळखळेन वाहुन वेगे'
सांगता तुझ्या स्वप्नांची का दल्दलिच्या चिखला खाली

विजयाची तुझी पताका, क्षितिजावर झळकवण्याची
भिंतीस पाहुनी का ग, उर्मी अशी गळाली

तुज तहानल्या बाळांना, जीवने द्यायची होती
निष्पाप जंगले का ग, पाण्यामध्ये बुडाली

जी पुरात हरवुन जातिल, ती नको आसवे ढाळू
चल बंड करूया वेडे, संघर्षच तुझ्या कपाळी

तो अथांग सागर अजुनी, तुज खुणावतो ग आहे
भिंतीस फोडण्या आता, परिपक्व वेळ ही झाली


-निखिल अनिल जोशी
२८-०२-२०११
गडचिरोली

Monday, February 14, 2011

ती होती संध्या मधुरा

लहानपणी शाळेतून आल्यावर गॅलरीत उभा रहायचो.
तेंव्हा रोज भेटायची मला सूर्य हाकणारी संध्या.
तो आज्ञाधारक सूर्य मग तिला पोहोचवायचा क्षितिजापर्यंत.
अगदी मोहोरून जायचा नभाने आच्छादलेला आणि क्षितिजापर्यंत विस्फारलेला घरामागचा माळ.
माळाचा थाट काय सांगावा!
काही गर्द झाडे आणि खूप सारी झुडुपे
मातीची अब्रू झाकणारे गवत, काहीसे हिरवे, काहीसे पिवळे.
ऑर्केस्ट्राचा प्रमुख वारा, त्याचे संकेत ओळखायचा तिथला निसर्ग.
मग पाने डोलायची वाऱ्याच्या तालावर.
निर्जीव पाचोळा, तोदेखील उडायचा वाऱ्याचे मंत्र ऐकून.
पिकल्या फळांची मात्र जाम फजिती व्हायची.
ती पाहून खळखळून हसायचा माळामधून वाहणारा ओढा.
या मैफिलीत मग षड्ज लावायची पाखरे.
माणसाच्या बेसूर रडगाण्यांना येथे मुळीच स्थान नव्हते.
एखाद्या वेड्या कवीला किंवा चित्रकाराला मात्र दुरून ऐकायची मुभा होती.

दिवस असेच जाऊ लागले.
माझी समज वाढत गेली.
बालपण मात्र कमी होत गेलं.

गॅलरीत उभा रहायला मला आता क्वचितच मिळायचा वेळ.
फिरायला गेलो तर क्षितिजापर्यंत पसरलेला माळ आता पूर्वीपेक्षा लवकर फिरून व्हायचा.
मी विचार केला, 'मोठा झालोय.
कदाचित पावले झाली असतील मोठी किंवा कदाचित वाढली असेल पावलांची गती.
कदाचित सळसळणाऱ्या रक्ताबरोबर आली असेल क्षितीज सर् करायची उर्मी.'

आता गॅलरीमध्ये घुमणारा पाखरांचा आवाज पूर्वीपेक्षा मोठ्याने घुमायचा.
मी विचार केला, 'मोठा झालोय.
झाल्या असतील इतक्या वर्षांत रेशीमगाठी घट्ट.
कदाचित पाखरांनाही कळली असेल आपली वेडी माया,
आणि निर्भयपणे वावरू लागली असतील आपल्या घराजवळ.'

दिवस जात होते.
मी मोठा होत होतो.
माळ खूपच कमी वेळेत तुडवून व्हायचा.
आणि गॅलरीमध्ये घुमणारा पाखरांचा आवाज थोडा मोठ्यानेच घुमायचा.

एके दिवशी मी फार मोठा झालो.
स्वप्नांचे मजले बांधत बांधत मी इंजिनियर झालो.
आता मी लोकांची घरे बांधणार होतो.
अपार्टमेंट, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स बांधणार होतो.
माझा आनंद गगनात मावेना.

का कोणास ठाऊक, मला अचानक जुनी गॅलरी आठवली.
वाटले, पाखरे एव्हाना निर्भयपणे बागडू लागली असतील घरात.
त्यांना सांगावा आपला आनंद,
आणि कराव्यात चार खुशालीच्या गोष्टी.
गॅलरीत गेलो.
का कोण जाणे, आज तिकडे सुतकी शुकशुकाट होता.
ती भयाण शांतता क्षणाक्षणाला माझा जीव घेत होती.
म्हटलं, आपल्या आवडत्या माळावर फिरायला जाऊ.
कमी वेळेत का होईना, पण आख्खा माळ तुडवून येऊ.
खाली गेलो तर माळही गायब!

आत्तापर्यंत व्हेज खाणारे पाहिले होते, नॉन-व्हेज खाणारे पाहिले होते.
पण या सिमेंटच्या जंगलाने आख्खा माळच्या माळ गिळून टाकला होता.

ती डुलणारी पाने, उडणारा पाचोळा, गाणारी पाखरं, खळखळून हसणारा ओढा...
कुठे गेले हे सगळे?
मला तर फक्त अपार्टमेंट्स, शॉपिंग मॉल्स, मल्टीप्लेक्सेस दिसतायत!

आजही मला सूर्य हाकणारी संध्या भेटते.
पण तो व्यवहारी सूर्य आता तिला क्षितिजापर्यंत पोहोचवत नाही,
एका उंच अपार्टमेंटच्या मागेच सोडून देतो.


- निखिल अनिल जोशी
४-४-२००९
कानपूर

माझिया मना

हे अनाम भय मज वाटत जाते

काचेमधुनी दृश्य पाहता मला भासतो तो आरसा
लोपुनि सुंदरता मज दिसती हेवे दावे आस तृषा
प्रतिमा माझ्या मला हिणवुनी, कटाक्ष अन तो क्रूर टाकुनी
खचलेल्या गर्वाला हरूनी, सद्सद्बुद्धीला अन छळुनी
फस्त गुणांची गुणी गुणसूत्रे, भरती अवगुण दाही दिशा
पापभीरू मन केविलवाणे बावरते मग दिनी निशा

अनाहूतशी चपलकल्पना मना कापऱ्या कापत जाते
स्वतःच निर्मित काळे चेटुक मनी भाबड्या दाटत जाते
हे अनाम भय मज वाटत जाते


कुण्या पाखरा उडता पाहून मला पिंजरा आठवतो
खडकावरला नाजूक अंकुर खडकावर मी गोठवतो
चंद्रतारका सर्वच मृगजळ, भोवतालचा तिमिर खरा
रखरखते जणू बाण उन्हाचे, सूर्याची ही अजब तऱ्हा
सरितेचि ति अनंत वळणे, सागरजल अन खारे खाष्ठ
आम्र मौसमी, द्राक्षे आंबट, माडाची अन् उंचिच जास्त


निसर्गनिर्मित चित्रहि मजला व्यंगचित्र जणु भासत जाते
खचूनी अर्धमेला मी मग लज्जा उरले मारत जाते
कर्म कफल्लक माझे मन मग शर्वीलकहि वाटत जाते
हे अनाम भय मज वाटत जाते



निराशा मनासी विनाशास वाहे
नसे ती अपत्ती अगंतूक पाहे
पहाटे क्षणार्धात स्वप्नी अभद्री
मुहूर्तास लग्नात कोणी मरावे

बही शूरवीरे नि आतून भित्रे
उपस्थित संदेह चित्रेविचित्रे
मनातील विश्वासही गोठलेला
असे द्रव्य दारी तरीही भुकेला

म्हणोनी निराशेस त्यागोनि द्यावे
सदा गूण्गुणोनी नवे गीत गावे
मनी आत्मविश्वास चिंतीत जावा
मना सज्जना मार्ग हा तू धरावा


-निखिल अनिल जोशी
पुणे
२००६