Monday, June 18, 2012

सेवाग्राममधील एक संध्याकाळ

            स्वतः नायनांसोबत (डॉ. अभय बंग) गांधीजींचा सेवाग्राम आश्रम पाहण्याचं भाग्य मला मिळालं. नायनांचं बालपण वर्ध्याचं. बालपणीचे संस्कार सेवाग्राम आश्रमातील शाळेत घडले. पुढल्या आयुष्यात याच संस्कारांचा ठसा मनावर राहिला. गांधींच्या तत्त्वांवर आधारित असे थक्क करायला लावणारे काम उभे केले. मात्र माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या उगमाबद्दल प्रचंड ओढ असते. सेवाग्राम आश्रम पाहून नायना थोडे हळवे झाले होते. कधीच आपल्या बालपणात बालपणात हरवून गेले होते. एरवी मोजके बोलणारे नायना तिथल्या प्रत्येक इमारत, प्रत्येक झाडाबद्दल भरभरून सांगत होते. मीहीभारावून जावून ऐकत होतो, त्यांचा एकही शब्द पडू नये याची काळजी घेत होतो.
            शाळा, वसतीगृह, अतिथीगृह, महादेवभाई व बापूंचे कार्यालय पाहिल्यानंतर शेवटी जिची आतुरतेने वाट पाहत होतो ती बापूकुटी आली. कुटी बांधण्यापूर्वी गांधींनी दोन अटी घातल्या होत्या. एक, कुटी ५०० रुपयांच्या आता बनावी. दुसरी, कुटी बांधण्यासाठीसाठी आश्रमापासून ५ मैलाच्या परिसरात जे सामान मिळू शकते तेवढेच सामान वापरावे. एखाद्या सामान्य खेड्यापासून ५ मैलाच्या अंतरावर काय काय मिळू शकते? माती आणि लाकडे. केवळ माती व लाकडापासून अतिशय टुमदार व कौलारू कुटी बनवलेली आहे. कुठेही लोखंडाचा अथवा सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. अगदी खिडक्यांचे गज व बीजागरीही बांबूपासून बनवलेले आहेत. कुठल्या मर्यादेपर्यंत आपल्या गरजा कमी करता येऊ शकतात त्याचे ही कुटी म्हणजे उत्तम उदाहरण आहे. आणि हो, साधेपणामुळे सौंदर्य कुठेच कमी झालेलं नाही. लाखो रुपयांच्या व हजारो मैल दूरच्या राजस्थानी टाईल्स, वरून मिरर पॉलिश, भिंतींना रासायनिक रंग अशा कोणत्याही आधुनिक घरापेक्षा स्वच्छ व सारवलेली कुटी मला लाखपटींनी सुंदर वाटते. आपण नेहमी ताज महाल बांधण्याच्या मागे लागलेलो असतो. तो बांधता बांधता मनावर ताणतणावाचे प्रचंड ओझे येते. तो बांधून झाल्यानंतर एवढा खर्चिक महाल जपता जपता पुन्हा नाकी नऊ येतात. बापूंच्या कुटीत मात्र जपण्यासारखे काहीच नव्हते. हां, इतक्या वर्षांनी परवा बापूंचा चष्मा चोरीला गेला. यावर पवानारचे श्री गोपाळ बजाज मोठ्या मार्मिकपणे म्हणाले 'चष्माच चोरीला गेला ना, बापूंची दृष्टी तर नाही गेली?'
            कुटीला कुंपणही बांबूचे होते, कुटीइतकेच सुंदर! कुंपणाबाहेर तीन भले मोठे दाट वृक्ष होते, दोन पिंपळाचे व एक बकुळाचा. पहिले पिंपळाचे झाड गांधी प्रथम सेवाग्रामला आले तेंव्हा लावले होते, तर दुसरे विनोबा भूदान यात्रा आटोपून परत आले तेंव्हा लावले होते. (त्यावेळी नायनाही विनोबांसोबत होते.) किती सुंदर कल्पना आहे celebration ची! झाड लावून! शेकडो वर्षे जगणाऱ्या झाडांच्या रूपाने तो क्षण अमर होऊन जातो. आपल्या आनंदाचा इतरांना त्रास नाही व पर्यावरणावरही कोणताच ताण नाही. बकुळाचे झाड कस्तुरबा गेल्या तेंव्हा लावले होते.  दुःखाला सामोरे कसे जावे ह्याचादेखील किती सुंदर मार्ग आहे! मृत्यूचा सामना नवीन जीवाच्या निर्मितीने! ते बकुळाचे झाड आज कस्तुरबांचे जिवंत स्मारक बनले आहे. (नाही तर आजकालचे नेते जिवंतपणी आणि स्वतःचेच भले मोठे पुतळे उभे करतात. हे पुतळे बनवण्याची प्रोसेस ही प्रचंड energy consuming व पर्यावरणाला मारक असते हा निराळाच मुद्दा!) सर्चमध्येदेखील दोन वृक्ष असेच आनंदाच्या क्षणी लावले गेले आहेत. एक वडाचे रोप, अम्मा-नायानांचे (डॉ. राणी व अभय बंग यांचे) गुरू कार्ल टेलर सर्चमध्ये आले होते तेंव्हा त्यांच्या हस्ते हॉस्पिटलजवळ लावण्यात आले होते. आज या वडाचा वटवृक्ष झाला आहे. सर्चच्या दवाखान्यात येणारे सर्व पेशंट्स त्याच्या सावलीत विश्रांती घेतात. दुसरे वडाचे रोप लावून तिबेटचे बौद्ध लामा रिम्पोचे यांच्या हस्ते अतिथीगृहाचे उद्घाटन झाले होते. आज हेदेखील झाड खूप मोठे झाले आहे.
      जी परंपरा गांधींनी सुरू केली, ती आपण चालू ठेवू शकतो का? एक सहज विचार मनात आला होता. आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून आपण एक रोप दिलं तर? वाढदिवस हे वाढीचे प्रतीक. वाढीसोबत जबाबदारी ही ओघानेच आली. पार्ट्या आणि इतर materialistic gifts देण्याऐवजी आपण एक रोप किमान एक वर्ष जगवण्याची जबाबदारी देऊ शकतो का? एका वनखात्याने किंवा काही ठराविक लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यावरणाची काळजी घ्यावी त्यापेक्षा हा विकेंद्रीत मार्ग सोपा व सोयीस्कर नाही का? आम्ही सर्चमध्ये वाढदिवस हा झाडदिवस म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. मित्र-मैत्रिणींना वाढदिवसाला भेट म्हणून झाड देण्याची प्रथा सुरू केली आहे.
      सेवाग्राममध्ये असेच आणखी एक झाड कधी काळी होते. कस्तुरबांच्या शेवटच्या काही दिवसांत गांधी त्यांच्यासोबत जेव्हा फिरायला जायचे, तेव्हा लवकरच बा थकून जायच्या. त्यासाठी गांधींनी एका झाडाभोवती चबुतरा बनवून घेतला होता. थकल्यानंतर बा त्या चबुतऱ्यावर थोडा वेळ विश्रांती घेत व पुन्हा चालू लागत. हे झाड मात्र आम्हाला दिसले नाही. नायनांना खूप हळहळ वाटली. मलाही खूप वाईट वाटले.
      एव्हाना अंधार पडू लागला होता. पाखरे आपापल्या झाडांवर परतत होती. आम्ही सेवाग्राम आश्रमाच्या बाहेर आलो. खारे शेंगदाणे विकणाऱ्या आजी घरी परतण्याची तयारी करत होत्यात्यांच्याकडून शेंगदाणे घेतले. नायना थोडेसे nostalgic झाले होते. परतण्याची वेळ तर झाली होती, पण पाउल मात्र निघत नव्हते. सचिन भाऊंना सुरू केलेली गाडी पुन्हा बंद करण्यास नायनांनी सांगितले. नायना मला घेऊन एका जुन्या इमारतीपाशी आले. तिची अवस्था पाहून ती वापरात नसावी हे कोणीही सांगितले असते. नायनांनी खुलासा केला. हे गांधीजींच्या काळात सुरू झालेले पोस्ट ऑफिस होते. गांधींना एका सर्वसामान्य खेड्यात एक सर्वसामान्य भारतीय बनून राहायचे होते. आश्रमात येण्यापूर्वी गांधींनी प्रथम गावकऱ्यांची परवानगी घेतली. सेवाग्रामला दळणवळण व संपर्काच्या काहीच सोयी नव्हत्या. मात्र व्हाईसरॉयला गांधींशी संपर्क साधता यावा म्हणून ब्रिटीश सरकारने लगेच टेलिफोन लाईन टाकली, पोस्ट ऑफिस बांधले. तीच ही पोस्टाची इमारत! याच इमारतीत रोज गांधींची लाखो पत्रे येत असतील! हेच पोस्ट ऑफिस पुढे बरीच वर्षे वापरात होते. नायना त्यांच्या लहानपणी रोज पोस्ट ऑफिसात जायचे. त्यांना तिकीटे जमवण्याचा छंद होता. पोस्टात कोणाकोणाची पत्रे येतात हे हेरून ठेवायचे व नंतर त्यांच्या घरी जाऊन पाकिटावरचे तिकीट मागायचे. एक पडकी इमारत अनेक आठवणींनी सजीव झाली होती. आज मात्र याच इमारतीशेजारी मोठे, दुमजली नवे पोस्ट ऑफिस बांधण्यात आले आहे.
      आश्रमाच्या बाहेर रचनवादी काम करणाऱ्या विवाहित जोडप्यांसाठी घरे बांधण्यात आली होती. आपले लहानपणीचे घर दाखवण्यासाठी नायना तिकडे घेऊन गेले. काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या होत्या. घरात राहणारेदेखील बदलले होते. पण घराबाहेरचे तुळशी वृंदावन मात्र अजूनही तसेच होते. एका बारीकशा पणतीच्या मंद प्रकाशात ते उजळून निघाले होते. मन प्रसन्न झाले. तिथल्या शांततेत आणि पणतीच्या मंद प्रकाशात अशी काय जादू होती? मला वाटते मन आनंदी राहण्यासाठी साध्या व छोट्या गोष्टी पुरेशा असतात. मात्र बाहेरून आपल्यावर सदैव झगमगाटाचा भडीमार केला जातो. मग आपल्याला मोठमोठे हॅलोजनचे दिवे व डॉल्बीशिवाय आनंदच मिळत नाही, मोठा आवाज करणारे फटाकेच उडवल्याशिवाय चैन पडत नाही, टीव्हीवरच्या अती नाटकी मालिका व सनसनाटी बातम्याच न पाहू तर जीवाची तगमग होते. नाजूक व तरल गोष्टींना प्रतिसाद द्यायची आपली क्षमताच संपून चाललीय की काय अशी कधीकधी भीती वाटते.
      या भारावलेल्या वातावरणात फोटो काढायचा मोह बऱ्याचदा झाला. मोठ्या कष्टाने हात आवरला. काही गोष्टी व काही क्षण मनात नेहमीच ताजे राहतात. आपण बळजबरीने त्यांना कृत्रिमरित्या साठवायचा प्रयत्न करतो व समोर प्रत्यक्ष जे सौंदर्य दिसत आहे ते मात्र पहायला विसरतो. एखाद्या तबलजीचे हात थिरकायला लागल्यावर आपण उत्साहाच्या भरात टाळ्या वाजवाव्यात व टाळ्यांच्या गोंधळात नेमकी सम हरवून जावी असेच काहीसे आयुष्यात घडत असते.
      जाता जाता नायना भावपूर्ण होऊन म्हणाले, “असं वाटतं की वर्षातले किमान १५ दिवस सर्व काही सोडून सेवाग्राममध्ये राहायला यावे.” आयुष्यभर नायनांनी गांधींची निर्गुण भक्ती केली. गांधींनी दाखवलेल्या कठोर कर्मयोगाच्या मार्गावर न थकता चालत राहिले. थक्क करून सोडेल इतके मोठे काम त्यांनी उभे केले. पण तरीही त्यांच्या मनात असणारी आपल्या उगमाबद्दलची ओढ सारखी जाणवत राहते. त्यांच्याकडे पाहून वाटतं कर्मयोगाला संवेदनशीलतेची वा भक्तीची जोड मिळते, निर्गुणाला सगुणाची जोड मिळते तेव्हा उभं आयुष्य बहरल्याशिवाय राहत नाही.

-        निखिल जोशी
गडचिरोली
२९ एप्रिल, २०१२

Friday, April 6, 2012

अम्मांचिया गावी प्रेमाचा सुकाळ


     पेशंट डॉक्टरना अजूनही देव मानतात. शहरात नसले तरी खेड्यात मानतात. पण एक डॉक्टर पेशंटकडे कसा पाहत असावा? किंवा त्याने कसे पाहिले पाहिजे? आपल्या कमाईचा स्त्रोत का सेवा करण्याची संधी देणारा देवदूत? रोग बरा करून घेण्याकरता आलेली एक व्यक्ती का समाजातील दारिद्र्य, रोगराई, चांगल्या-वाईट चालीरीतींचे एक पुसट प्रतिबिंब? आपला उद्धटपणा हतबलपणे सहन करणारा एक याचक का ज्याच्यापुढे नम्र व्हावे असा पारंपारिक ज्ञानाचा चालताबोलता खजिना? माझ्या सुदैवाने मला डॉ. राणी बंग (अम्मा) यांच्यासोबत काही महिने काम करण्याची संधी मिळाली. त्या आपल्या रोग्यांकडे कशा बघतात हे जवळून बघता आले.

     खास अम्मांना दाखवण्यासाठी इथल्या दवाखान्यात दोन-दोनशे किलोमीटर अंतरावरून पेशंट येतात. त्यासाठी त्यांचे ज्ञान, आपल्या क्षेत्रातले कौशल्य ही कारणे आहेतच, पण त्याहीपेक्षा मला त्यांचे भावते ते पेशंटसोबत संवाद साधण्याची हातोटी. प्रेम व दरारा यांचे सुयोग्य मिश्रण असलेले ते एक अजब रसायन आहे. आपल्या आई-वडिलांसमोर अजिबात तोंड न उघडणाऱ्या मुलींना, नवऱ्यासमोर मान वर काढण्याची हिम्मत न करू शकणाऱ्या बायकांना बोलते कसे करायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. जास्त पुढे पुढे करणाऱ्या नवऱ्यांना त्या एका झटक्यात शांत करतात. बाईने एकटीनेच आत यावे, आपल्या तक्रारी स्वतःच सांगाव्यात असा त्यांचा कटाक्ष असतो. स्वतःला स्वतःबद्दल बोलण्याची कधीही संधी न मिळणाऱ्या बायका मग त्यांच्यासमोर भरभरून मन मोकळे करतात
  
     मात्र आयुष्यभर पदराआड राहण्याची सवय असणाऱ्या खेड्यातल्या स्त्रिया कधी कधी भिडेखातर स्त्रीरोगाच्या तपासण्या करून घ्यायला तयारच होत नाहीत. किंवा कधी कधी पेशंटना काहीच झालेले नसते. पण तसे सांगून त्यांचे समाधान होत नाही. 'औषधी द्या ना जी.' म्हणत ते गोळ्या/इंजेक्शनचा प्रचंड आग्रह धरतात. अशा वेळी गरज असते ती अधिकारवाणीने रागावण्याची. त्यात अम्मा अजिबातच कसर सोडत नाहीत. डोळे वटारले की अर्धे काम तिथेच होते. नर्सेसना न जुमानणारे पेशंट त्यांच्यापुढे लगेच शांत होतात. मात्र त्यांच्या रागावण्यात वैयक्तिक द्वेष कधीच नसतो. त्यांच्याकडून मी एक गोष्ट चांगलीच शिकलोय. प्रेम म्हणजे केवळ गोड गोड बोलणे नव्हे. पेशंटच्या भल्यासाठी प्रसंगी कठोर होणे हेच खऱ्या डोळस प्रेमाचे लक्षण आहे.

     अम्मांच्या केबिनबाहेर नेहमी एक नेल-कटर लटकत असतो. पेशंटची नखं वाढली असतील तर तिची काही धडगत नसते. "आधी नखं कापून ये, त्याशिवाय मी नाही तपासणार." असा आदेश घेऊन पेशंट बिचारी हात हलवत नेलकटरकडे जाते. मात्र पेशंटला एक न्याय व स्टाफला दुसरा असा इथे रिवाज नाही. नर्सेस, बरोबरीचे डॉक्टर्स, कोणाचीही नखे वाढली असतील तरी रवानगी नेलकटरकडे होते. नखं कापण्यासाठी रागावणं म्हणजे मला नम्रतेचं प्रतीक वाटतं. 'मी specialization केलंय. मी केवळ गोळ्या प्रिस्क्राईब करेन, इंजेक्शन देईन, सोनोग्राफी करेन, सर्जरी करेन.' असा इगो न ठेवता 'पेशंटची नखे वाढणे हेही अनारोग्याचेच लक्षण आहे आणि ते दूर करणं ही माझीच जबाबदारी आहे' असा holistic approach घेणे ही त्यांची विशेषता आहे.
 
    पेशंटची गैरसोय होऊ नये याबाबत त्यांचा कमालीचा कटाक्ष असतो. दररोज दोन-तीनदा त्या सगळे संडास बाथरूम्स स्वच्छ आहेत ना याची खात्री करून घेतात. तसेच दवाखान्याचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी त्या कमालीच्या आग्रही असतात. एकदा एका बाळाने दवाखान्याच्या आवारातच संडास केली होती. लगेचच ती स्वतः अम्मांना साफ करताना मी पाहिलंय. एखादे उद्दिष्ट सर्वोच्चपदी ठेवले तर 'मी'पणा दुय्यम होऊन जातो व कोणतेच काम हलके उरत नाही हे शिकतोय मी त्यांच्याकडून.

     एकदा एक आई आपल्या मुलीला दाखवायला घेऊन आली होती. मुलीचे नाव होते 'निराशा मोहुर्ले.' अम्मांनी तिला केबिनमध्ये बोलवले, तपासले, औषधे लिहून दिली. नंतर तिच्या आईला आत बोलावले. थोडी खोलात चौकशी केली असता कळले की खूप इच्छा असूनही मुलगा झाला नाही म्हणून वैतागून बाळाचे नाव निराशा ठेवले होते. अम्मांनी आईला झाप झाप झापले. एक स्त्री असूनही आईने याला विरोध केला नाही याची त्यांना मनस्वी चीड आली होती. 'पुढच्या वेळी यायच्या आधी हिचं नाव बदलून आशा ठेवलं नाही तर मी तपासणार नाही' अशी ताकीद दिली. इथेही 'केवळ आरोग्य' असा reductionist approach न ठेवता holistic approach ने त्यांनी त्या प्रसंगाकडे ज्या सहजतेने पाहिले त्यातून खूप काही घेण्यासारखं आहे.
 
    एकदा एक तेलगु बोलणारी बाई नवऱ्यासोबत दवाखान्यात आली. नवरा तर मराठीतूनच बोलायचा. चौकशी करता लक्षात आले की ते कुटुंब व्यवसायासाठी आंध्रमधून गडचिरोली जिल्ह्यात आलं होतं. गेली १६ वर्षे ते गडचिरोलीतच राहत होते. अम्मांनी 'हिला मराठी का येत नाही?' असं नवऱ्याला विचारलं. नवरा म्हणाला 'गरजच पडत नाही. घरात सगळे तेलगुच बोलतात.' ही बाई १६ वर्षे घराच्या बाहेर पडून कोणाशी बोललीच नाही याचा अम्मांना प्रचंड राग आला. अम्मांची स्वतःची मातृभाषा तेलगु आहे. स्वतःचे उदाहरण देऊन त्यांनी नवऱ्याला मराठीतून व बायकोला तेलागूतून झापले. केवळ चूल व मूल यांच्यात अडकून न राहता घराबाहेर पडण्याची व मराठी शिकण्याची ताकीद दिली व मगच त्यांना तपासले.
 
    जगातले सगळे ज्ञान आपल्याकडेच आहे, समोरचा याचक पेशंट मायबाप डॉक्टरांकडे आरोग्याची भीक मागण्यासाठी आला आहे व आपले frustration त्याच्यावर काढण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे अशी प्रामाणिक समजूत असलेल्या डॉक्टरांचा जिकडेतिकडे सुकाळ झालेला असताना अम्मांची नम्रता मला कमालीची भावते. पेशंट आपल्याला खूप काही शिकवू शकतो याची जाण असलेल्या अम्मा सदैव पेशंटकडून काय शिकता येईल या शोधात असतात. एखाद्या पेशंटची साडी आवडली तर तिला थांबवून त्यावरचे डिझाईन काढून घेतात. एखाद्या पेशंटने गावठी औषधीबद्दल सांगितले तर त्याला मूर्खात न काढता तो काय बोलतोय हे खरं आहे का याची खात्री करून घेतात. झाडे व बागकामात विशेष रस असल्यामुळे लोकल भागात आढळणाऱ्या झाडांबद्दल एखाद्या अडाणी पेशंटला विचारतानाही मुळीच कचरत नाहीत. लोकांच्या परंपरा व समजुती कशा जाणून घेता येतील या प्रयत्नात त्या सदैव असतात. त्यासाठी पेशंटसोबत, त्यांच्या नातेवाईकांसोबत एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाने बोलतात. पेशंट व नातेवाईकही उत्साहाच्या भरात खूप काही सांगून जातात. मग ओपीडी म्हणजे केवळ रंजल्या-गांजल्या खचल्या-पिचल्या पेशंटची तुडुंब गर्दी न उरता गडचिरोलीच्या संस्कृतीची एक प्रदर्शनीच होऊन जातो. दवाखाना तोच असतो, पण केवळ पहायची दृष्टी बदलते व रोजचं रहाट घाडगं सुखकर होऊन जाते. माझे दवाखान्यातले काम संपून आज बरेच महिने उलटले आहेत. पण कधी काही कारणाने मन उदास झाले की आयुष्याच्या क्षणाक्षणात व कणाकणात सौंदर्य शोधणाऱ्या अम्मा डोळ्यांसमोर येतात, एका क्षणात मरगळ गळून पडते व मन पुन्हा एकदा प्रफुल्लित होऊन जातं.

  • निखिल जोशी
    ६ एप्रिल, २०१२
    गडचिरोली

Sunday, December 4, 2011

शोध स्वतःचा


सिकंदराबादला चंद्रपूरकडे जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेस मध्ये मी एकदाचा बसलो, मगच मला विश्वास वाटू लागला की आपण शोधग्राम, गडचिरोलीला जात आहोत. खूप हायसं वाटलं. दोन दिवस का होईना पण मी त्या अंधाऱ्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर डोकं गहाण ठेऊन बसणार नव्हतो. धूरामधून मार्ग काढत सिमेंटच्या जंगलात स्वतःचाच कधीपासून हरवलेला पत्ता शोधत भटकणार नव्हतो. दोन दिवस मी यंत्रमानवांपासून दूर खरोखरच्या माणसांमध्ये मिसळून जाण्यासाठी निघालो होतो. ट्रेनचा भोंगा वाजला आणि मी माझ्या बंदिस्त विश्वात उसना का होईना पण मोकळा श्वास घेतला.

सकाळी साडेपाचला आगगाडीने मराठी मातीत प्रवेश केला. छाती भरून आल्यासारखं वाटलं. २१ वर्षे महाराष्ट्रात होतो तेंव्हा किंमत कळली नाही, पण दोन वर्षं कानपूर व एक वर्ष हैदराबादला राहून चांगलाच वठणीवर आलो होतो. चंद्रपूरला उतरून गडचिरोलीला जाणाऱ्या लाल-पिवळ्या एस.टी.त बसलो. काही गोष्टी या आपल्या खास मर्मबंधातल्या ठेवी असतात. एस.टी. ही त्यांपैकीच एक. मला उगीचच 'बालपण गमले मजला असे काहीसे वाटून गेले. असो.

चंद्रपूर सोडले. पाच मिनिटातच मी पहिली पाटी वाचली, 'सावधान! वाघ-बिबट्यांचा वावर'. अचानक लक्षात आले, अरेच्या, असेही प्राणी निसर्गात असतात हे मी विसरूनच गेलो होतो. नाही तर आमचा वाघाशी संबंध म्हणजे IPL च्या ब्रेक मध्ये ढोणीची 'Save the tiger' ची जाहिरात लागते तेवढाच. मला इकडच्या लोकांचा खूप हेवा वाटला. लगेचच पानगळीचे पण घनदाट जंगल सुरू झाले. अहो उघडी-नागडी, बेअब्रू झालेली जमीन कुठेच दिसेना. जिकडे तिकडे या प्रदेशाची श्रीमंती दाखवणारे पाचोळ्याचे अच्छादन! चैत्र जवळ येऊ घातला होता. पानगळीच्या झाडांना पालवीचे दागिने फुटण्यास प्रारंभ झाला होता. हे दागिने सूर्यकिरणांची पहिली तिरीप पडून खूपच उठून दिसत होते. वसंताची चाहूल लागून फुललेल्या फुलोऱ्यामुळे जंगल रंगीबेरंगी व मोहक वाटत होते.

वाटेत गावांची नावे पण किती सुंदर! मुल, सावली, व्याहाड! अशी काही गावे गेल्यानंतर मध्येच एस.टी.तल्या एका बाळाला शू लागली. त्यासाठी खास आमच्या बसने स्टॉप घेतला. आई बाळाला घेऊन खाली उतरली. बाकीचे प्याशिंजर खिडकीतून 'श्शsss श्शsss' करत बाळाला प्रोत्साहन देऊ लागले. उत्साहाच्या भरात बाळाने विदर्भाच्या भूमीत 'शू'दानाबरोबरच 'शी'दानही केले. एका दयाळू प्याशिंजरने धुण्यासाठी आपली पिण्याच्या पाण्याची बाटली देऊ केली (सरप्रायाझिंगली ती बाटली बिसलेरीची नव्हती!). यथावकाश धुण्याचाही कार्यक्रम पार पडला. असा हा साघ्रसंगीत सोहळा एकदाचा आटोपला आणि प्याशिंजरांनी टाळ्या वाजवल्या. गडचिरोलीला पोचण्यासाठी दोनाचे अडीच तास होतील म्हणून कोणीच गोंधळ घातला नाही. ह्या प्याशिंजरांना घड्याळाचे काटे किंवा कोणतेही इन्सेंटिव्ह कंट्रोल करत नव्हते. म्हणूनच ते जीवनाचा प्रत्येक क्षण जगत होते, अनुभवत होते, त्याचा आनंद घेत होते. सहजपणे एक-दुसऱ्याच्या सुखदुःखात, अडीअडचणीत समरस होत होते.

गडचिरोलीस पोचल्यानंतर धानोऱ्याला जाणारी बस पकडली. गडचिरोलीच्या आसपास विरळ झालेले जंगल पुन्हा एकदा घनदाट झाले. जंगलाचा लांब निर्मनुष्य पट्टा आणि मध्येच नजर लागू नये म्हणून जंगलाच्या कुशीत वसलेली छोटी छोटी गावे. वाटेत एक पाटी वाचली. 'अभिनंदन! अमुक अमुक गावात २००९ साली एकही बालमृत्यू नाही.' सर्च जवळ आल्याची खात्री पटली. चातगावजवळ उतरून थोडेसे चालत गेल्यानंतर मी डॉ. अभय व राणी बंग यांच्या कार्यक्षेत्रात, शोधग्रामला दाखल झालो.

शोधग्रामच्या कमानीतून प्रवेश करतो तोच अतिशय मधुर असा किलबिलाट ऐकून माझी पावले थबकली. पाहिले तर दोन रॉबिन्स कोणत्या तरी विषयावर गंभीर चर्चा करत होते. नाही तर आमच्या डोक्यात दोनच आवाज फिट्ट! एक ऑफिसमधला ए.सी. आणि दुसरा कॉम्प्युटरचा पंखा. ट्राफिकचा गोंगाट तर आजकाल इतका रक्तात भिनलाय की हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे तो ऐकू येणेही बंद झालंय. पक्ष्यांचा आवाज सोडाच, माणसेही एकमेकांशी बोलणे म्हणजे दसरा-दिवाळी. असो. त्या रॉबिन्सच्या चर्चेत अनेक पक्ष्यांनी सहभाग घेणं सुरू केलं. फुलपाखरे मध गोळा करता करता हळूच ही चर्चा ऐकू लागली. मन कसं प्रसन्न टवटवीत झालं.

शोधग्रामला पोहोचण्याआधीच मन मोहोरून गेलं होतं. आता शोधग्राममध्ये पुढचे दोन दिवस जे काही अनुभव मिळतील ते तर बोनस होते. तसं पाहिलं तर पक्षी, झाडे पाहून एवढं खूष होण्याची काय गरज होती? मला वाटतं निसर्गाकडे माणसाची एक नैसर्गिक ओढ असते. मात्र आपल्या मनात पैसा व इतर materialistic गोष्टी हेच माणसाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असे घडत्या वयात बिंबवले जाते. मग आपण आपल्या सर्व नैसर्गिक कलांना बगल देउन निसर्गापासून दूर पैशाच्या खाणीत मोलमजुरी करत राहतो. एक वेगळे छोटेसे कृत्रिम विश्व आपल्या भोवती तयार करतो. याच मर्यादित जागेत आपला विस्तार करण्यासाठी धडपड करतो. या विस्ताराची किंमत मग मनाची शांती देउन चुकवावी लागते.

शोधग्रामचे हे प्रवेशद्वार मला कृत्रिम व मर्यादित विश्वाच्या भिंती ओलांडून अधिक नैसर्गिक आणि अधिक स्वाभाविक विश्वात प्रवेश करण्यासाठी खुणावत तर नव्हते?


    - निखिल अनिल जोशी
            हैदराबाद  
      मार्च, २०१०

Monday, November 14, 2011

गुंड्या आणि बंड्या



यक कुटुंब व्हतं भलं
घरामंदि सुख त्यांच्या खेळं
सोसुनी भुकेची झळं
केलं कष्ट चाखाया फळं
कष्टाचि मिळाली फळं
लवकरच झालं अन् जुळं
(यक गुंड्या नि यक बंड्या)
गुंड्या शाणं, बंड्या खुळं
गुंड्या चिकनं गोरंपान
बंड्या कुळकुळीत हो काळं
(त्यांच्या आईला प्रश्न पडला)
द्येवा असं कसं हो झालं?


(दोघं साळंला जाऊ लागले)
गुंड्या हुश्शार आनी न्येकं
वर्गामंदी नंबर येकं
बंड्या कसा करंटा लेकं
परिक्षेत फ्रॉड अन् फेकं
गुरुजी म्हणाले 'इनफ'
काढले जालीम औषध येकं
आधि दिला छड्यांचा शेकं
मग म्हणाले 'गिव्ह हिमं ब्रेकं'

गुंड्या येळीच म्याट्रिक झालं
बंड्या किती किती व्हं ढकललं
सातव्या यत्तेस असं चिकटलं
ह्याच्यापरीस फेविकॉल बरं
(गुरुजींना प्रश्न पडला)
द्येवा असं कसं हो झालं?


गुंड्या कालेजात जाई
बंड्या गल्लीमधला भाई
अशी वरसं गेले काही
गुंड्या पोलीस खात्यात इन
बंड्या हप्ता अन् स्मगलिंग
गुंड्या पराक्रम नवनवा
आनि बंड्या........
नवनव्या जेलांची हवा


येके दिवशी चिमित्कार झाला
घरामंदी फोन वाजला
हिकडं आयेनं फोन उचलला
पलिकडून आवाज आला
तोऱ्यात बाबू बोलला
'तुमचा बंड्या मंत्री झाला नि गुंड्या शिक्यूरिटी'
आज बंड्या ऐटीत चालं नि गुंड्या शेपटी
हाच जगाचा न्याव असे हो द्येवा, जि रं दाजि रं जी जी, रं जी जी जी जी हो!



(आय.आय.टी. कानपूरमधील महाराष्ट्र मंडळाच्या 'प्रतिबिंब' या २००९ साली झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हा परफॉर्मन्स केला होता.)



    - निखिल अनिल जोशी
   १४ जानेवारी २००९
   कानपूर

Sunday, November 6, 2011

घरटे


धडपडणारे चार हात
पाउस-वारा-अंधारातहि
प्रकाशलेली अंतर्वात

चार डोळे एक दृष्टी
सुंदर बनवू आपुली सृष्टी

एकेक वीट रचत रचत
चौतीस वर्षे पडत उठत
भातुकलीचे इवले घरटे
आज जाहले उदंड मोठे



घरट्यामध्ये राजा-राणी
अखंड उत्साही सहकारी
सहकाऱ्यांची छोटी गावे
गावामधल्या हतबल स्त्रिया
सोशित ज्वाळा स्त्रीरोगाच्या
लाथा दारूड्या नवऱ्याच्या
व्यसनाधीन जरी हे नवरे
आपुले दुखणे आपुले चेहरे

जगण्यासाठी लढता लढता
बालपणातच थकले बाळ
जगले तर त्याच्या वाटेवर
पौगंडात निसरडी साल

दूरदेशिच्या रानामध्ये
आजारांशी झुंजत झुंजत
दारूसंगे झिंगत झिंगत
समस्यांची खोदत खाण
साधेभोळे आदीवासी
कवडीमोल तयांचे प्राण

गोंधळलेली बावरलेली
प्रवाहासवे आदळुन आपटुन
आता थोडे सावरलेली
तरुणाई शोधत वाटा
चाकोरिस देउन फाटा



हे घरटे तर भरले गोकुळ
सर्वांचे अपुलेसे गोटुल
भव्यता नसे जिथे दिव्यता
माणूस जपणे हीच धन्यता

माणुस येथे कणाकणातुन
सर्व थरातुन सर्व कुळातुन
जो पिचलेला वा खचलेला
विठ्ठल तो सेवेस भुकेला

चौतिस वर्षे या घरट्याची
जित्या-जागत्या इतिहासाची
आणखी चौतिस घडो साधना
ईश्वरचरणी हीच प्रार्थना.


(ही कविता अम्मा-नायानांच्या लग्नाच्या चौतिसाव्या वाढदिवसानिमित्त केली आहे.)

  • निखिल अनिल जोशी
    गडचिरोली
    २ नोव्हेंबर, २०११

Wednesday, October 26, 2011

अर्धा ग्लास


बोलणारे बोलत राहतात
नागवा करून बटाट्याला
पुन्हा पुन्हा सोलत राहतात

सदान् कदा काहीतरी
उणे-दुणे काढत राहतील
ग्लास अर्धा भरला तरी
अर्धा रिता म्हणत राहतील
बोलणाऱ्यांचा काय कधी
ग्लास भरतो काठोकाठ?
उथळ पाण्यामध्येच होतो
बुडबुड्यांचा खळखळाट

अर्धा तुझा ग्लास आहे
तोच खूप खास आहे
वाटेवरती अंधाराच्या
उजेडाचा ध्यास आहे
हतबल हरल्या मनांसाठी
आशेचा सुवास आहे
उत्साहाचे प्रसन्न गाणे
सहज विनासायास आहे

आज नव्या वळणावर
निराशेच्या सरणावर
ही उगवेल प्रसन्न पहाट
काट्यांमधुनी पाउलवाट
वाट तुडव तू त्वेषाने
काटे काढुनि काट्याने
काट्यांची तुज नशा मिळो
स्वप्नांना अन् दिशा मिळो

- निखिल अनिल जोशी
    गडचिरोली  
  १७ ऑगस्ट, २०११

 
(ही कविता अमोल पाटील या मित्राच्या वाढ-दिवसानिमित्त केली होती. अमोल इलेक्ट्रिकल इंजीनियर होऊन जळगावच्या एम.एस..बी.त लागला. तिथल्या सुखासीन परिस्थितीत काम करणे त्याला मानवले नाही. जिथे शिक्षा म्हणून बदली होते, अशा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात त्याने बदली मागून घेतली. धानोरा तालुका पूर्णपणे गोंड आदिवासींचा असून जंगलात लपला असल्याने नक्षलग्रस्त आहे. तिकडे बऱ्याच गावांत अजून वीजच पोचली नाही. इतर अनेक गावांत लाईन असूनही २०-२० वर्षे दुरुस्ती न झाल्याने वीज नाही. ज्या गावात वीज आहे, तेथे लाईनवर जंगलातल्या फांद्या पडून नेहमी ब्रेकडाऊन होत असते. मग ते नक्की कुठे झालंय हे शोधत अमोल ५०-६० किमी गाडीवरून निर्मनुष्य जंगलातून रात्री-अपरात्री फिरतो. सोबत एखादा लाईनमन. १४ उपलब्ध जागांपैकी फक्त ३ लाईनमनच्या जागा भरलेल्या आहेत. या भागात कोणी यायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे. जे ३ लाईनमन आहेत, ते पार खचून दारूच्या आहारी गेले आहेत. त्यांची क्रयशक्ती शून्य आहे. मग contract basis वर गावातल्याच लोकांना कामगार म्हणून घेतले जाते. त्यांच्याकडून खूप काम करून घेतले जाते, पण पगार वेळेत मिळत नाही. मग त्यापायी अमोलची चिडचिड सुरू होते. वरिष्ठांकडे जावे तर ते देखील हतबल असतात व हात वर करतात. साध्या कामासाठी वारंवार दूरदूर चकरा माराव्या लागतात. सरकारी कारभारात कामे पुढे ढकलली जातात. मात्र मार्च जवळ आला की महावितरण खडबडून जागे होते. १००-१५० रुपयांच्या थकबाकीसाठी गरीब लोकांची वीज कापली जाते. त्याच वेळी मुंबईच्या मॉल्समध्ये विजेची उधळपट्टी सुरू असते. मग त्याला 'मी कोण?', 'मी हा आटापिटा कशासाठी करतोय?' असे अध्यात्मिक प्रश्न पडू लागतात.
अशा हतबल परिस्थितीत आम्ही त्याला फुकटचे सल्ले देण्याचे काम करतो, बऱ्याचदा शिव्या देतो. मात्र अखंड उत्साहाने त्याची धडपड सुरू असते. बरीच झटपट केल्यानंतर एखादे गाव प्रकाशमान होते. तेंव्हा त्याच्या डोळ्यांतला आनंद साऱ्या 'कां'ची उत्तरे देऊन जातो. झापून कामे होत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या स्टाफसोबत मैत्री केली आहे. त्यांची दारू सुटावी म्हणून अखंड प्रयत्न करतोय. व्यसनमुक्त होण्यासाठी सर्चच्या व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन येतो. दारू पिऊन घरी पडण्यापेक्षा कमीत कमी ऑफिसमध्ये यावे म्हणून त्याने टीव्हीसेट आणला आहे, वॉलीबॉलचे कोर्ट बनवले आहे. अभिमानाने सांगता येईल असे एक तरी काम प्रत्येकाने दर आठवड्यात करावे असे त्यांना टारगेट दिले आहे. त्यांच्याबरोबर तो कोजागिरीसारखे सणदेखील साजरे करतो. आहे त्या कठीण परिस्थितीत काम पुढे कसे न्यावे हे तो रोज शिकत आहे. आज आपले गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी तिथल्या लोकांना हक्काचा अधिकारी मिळाला आहे. अपुरे मनुष्यबळ व साधनांसह तो जी झुंज देत आहे, त्यामुळे कोणती क्रांती झाली नसली तरी आजूबाजूच्या ३ लाईनमनच्या व पाच-पन्नास आदिवासींच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधानाचे हसू आहे. या लढाईसाठी त्याला वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा!)

Friday, July 22, 2011

मुक्त

आटपाट झाड होते, एक वडाचे म्हातारे
दाढी होती दाट त्याची, अन् डोक्यावर भारे

वाटसरूला सावली, मिळो पाखरा घरटे
उभे आशीर्वाद देत, उन्ह्सरींत एकटे

माया माऊलीची लावी, त्याची लेकरे पाखरं
पानाफांद्यांत घरटी, माती-मुळाशी भाकर

सायंकाळी पाखरांची, तेथे गाठभेट होई
कीलबीलाट करता, नभ निनादुन जाई

गुण्यागोविंदानं होतं सारं सुरळीत सुरू
कोणी लाविली नजर, वेडं जाहलं पाखरू

हाड तुटता जिभेचं, ताळतंत्र सोडूनिया
एकाएकी लागलं ते, वेडे त्वेषाने बोलाया

“वीट आला आहे मज, माझ्या विटाळ जिण्याचा
भोग भोगले कितीही, तरी ठाव न सुखाचा

दीसभर शोधूनिया, किडे-मकोडे मातित
जगू तरी कसे असे, घास घशात ओतीत

घाम गाळूनिया एक एक काटकी जोडणे
पण ओल पावसात, उन्हातान्हात भाजणे

पुरे झाली फरफट, आता घेईन भरारी
सोनियाच्या पिंजऱ्यात, कुण्या सधन महाली

पिंजऱ्यात सोनियाच्या, चैन चणे-फुटाण्याची
बंद खोलीत कसली, भिति ऊन-पावसाची

पारध्याच्या जाळ्यामध्ये, अडकवून घेईन
धनिकाच्या घरी मग, सून बनून जाईन"

क्षणभर कूजबूज, मग शांतता भयाण
पानांतूनी टपटप, आसू ढाळले वडानं

“दिल्या घरी रहा सुखी", वड बोलला क्लेशाने
जळे कापरे काळीज, खोलवरच्या खेदाने

*****************

मोठमोठ्या जखमांना, नामि औषध काळाचे
हळुहळू सावरले, नातलग पाखराचे

अचानक एके दिनी, थोडे चालत उडत
परतले पाखरू का, घरी रडत रडत

भाऊबंद जमा झाले, वड रोखुनी नजर
ऐकण्यास पाखराची, सारे कहाणी आतुर

“कसा पळ काढला मी, काय भोगल्या यातना
नका विचारू, काहीही बोलवेना साहवेना

चूक झाली मायबाप, जीवाभावाच्या सख्यांनो
मृगजळामागे आता, जाणे होणे न गड्यांनो

जिला माती म्हटले मी, माझ्यासाठी तेच मोती
गळणाऱ्या नभीच रे, फुले अभिमानी छाती

सोनपिंजरा नको तो, छाटे पंख जो मनाचे
प्रिय झोपडे वडाशी, देई स्वप्न गगनाचे

कशापायी भुललो मी, आज आरसा बघेन
ऋण फेडीन वडाचे, मग मातीत मिळेन"

वड पहाडाएवढा, गहीवरोनिया गेला
धीरगंभीर मार्दव, थोड्या प्रेमाने बोलला

“बाळा मिळते म्हणून, सदा मागत का जावे?
मातीमोल मोहापायी, कधी स्वतःला विकावे?

गगनाला गवसणी, घालण्याचा रे स्वभाव
तर हवी कशापायी, सोनपिंजऱ्याची हाव?

किडे-काटक्या वेचणे, तुझ्या जीवनाचे मर्म
हाच नाही का रे वेड्या, तुझ्या कूळाचा स्वधर्म?

जीवाच्याही खूप आधी त्याचा स्वधर्म जन्मतो
त्यागल्यासी कोरे गोटे, पाळल्यासी लेणी होतो

कधी होतो कोणी सुखी, सांग कर्तव्य टाकूनी?
मुक्तीपथ बहरतो, स्वधर्माचिये बंधनी ”

(प्रेरणा: मंगेश पाडगावकरांच्या पुढील ओळी-
'काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी
 भान राधिके नुरे ऐकताच बासरी
 बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा')


- निखिल अनिल जोशी
गडचिरोली
२२-७-२०११