Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Thursday, May 26, 2011

माझी पहिली प्रस्तावना

प्रस्तावना या शब्दाबद्दल मला लहानपणापासूनच विलक्षण कुतूहल आहे. कोणत्याही पुस्तकातील म्याटर वाचण्यापेक्षा मला त्याची प्रस्तावना वाचण्यासाठीच जास्त वेळ लागतो. किंबहुना प्रस्तावना वाचल्यानंतर माझा स्ट्यामिना, पेशन्स, विवेक, कुणीतरी डोस दिल्यानंतर पुस्तक मिळवून (बहुधा फुकटचे) वाचनाला सुरुवात करण्याचा उत्साह (एक पुस्तक वाचण्याची सुरुवात मी खूप वेळा करतो) किंवा आकलनशक्ती (जी महत्त्वाच्या वेळी हमखास दगा देते) यांपैकी काही तरी संपते. मग ते पुस्तक मला व मी पुस्तकाला 'गांधीगिरीने' समझोता करून त्रास देण्याचे टाळतो. "शो मस्ट गो ऑन" या कोण्या महापुरुषाने म्हटलेल्या उक्तीप्रमाणे मी नेहमीचे काम ("तुला काय काम असते" असा टोमणा मारून माझे मित्र त्यांचे जे काम मला देतात ते) करत राहतो, किंवा नवीन पुस्तकाची सुरुवात करतो. ते पुस्तकही (सोडलेले) आजोबांच्या बुक शेल्फ मध्ये मोठ्या डौलाने उभे असते. मग मित्राचा रागारागाने ते रिटर्न करण्यासाठी फोन आल्याशिवाय मला त्याची आठवण होत नाही. तर मुद्दा असा की प्रस्तावना हा माझा जिव्हाळ्याचा विषय. 'इलेक्ट्रोमॅग्नेटीक्स'च्या पुस्तकाच्या प्रस्तावनेचे परीक्षण करण्यातच सारा वेळ गेल्यामुळे माझा पहिला धडा सुरू करायचेच राहून गेले. त्यामुळे महत्प्रयासांनी (आणि पुणे विद्यापीठाच्या कृपेने) आतापर्यंत कशीबशी टाळलेली ए.टी.के.टी. अखेर मला बसलीच; याचे एकमेव कारण म्हणजे प्रस्तावना असे एक्स्पर्ट ओपिनिअन पडले (या एक्स्पर्ट पॅनल मध्ये मी व माझा के.टी. लागलेला दुसरा मित्र होतो.). पण मला त्याचा खेद नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे प्रस्तावना हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.

"स्वप्ने पहा" अशी शिकवण आपल्या पपू राष्ट्रपतींनी दिली आहे. लहानपणापासून अनेक स्वप्ने पाहिली. (आईच्या म्हणण्यानुसार त्यांना दिवास्वप्ने म्हणतात. परंतु चार अक्षरे लिहिण्यापेक्षा दोन अक्षरे लिहून आशय काळात असेल तर उगीच शाई का वाया घालावा? गेल्या चार परीक्षा व त्यांच्यामधल्या मिड-सेम एक्झाम्सना मिळून ही करंट रिफील पुरली असली तरी आता ती संपत आली आहे.) त्यातली काही स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत, तर बाकीच्यांचा मी नाद सोडून दिला. पण माझं एक जुनं स्वप्न की 'भले कादंबऱ्या, नाटके, कथा, कविता, व्यक्तीचित्रे अथवा प्रवासवर्णने लिहिता आली नाहीत तरी बेहत्तर, पण आयुष्यात एखादीतरी प्रस्तावना लिहिल्याशिवाय राहणार नाही. (कशाची ते अजून डीसाईड झालं नाही.)' पूर्ण करण्याचं मी तडकाफडकीने ठरवलं आहे. त्याला कारणंही तशीच आहेत.

अॅचिव्हमेंट्स, स्कॉलरशिप्स या सदरामध्ये (आता इंजीनियरिंगचे शेवटचे वर्ष आहे. नोकरीचे वेध लागलेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी बायोडाटा या प्रकारात स्वतःचे कौतुक प्रस्तुत सदराखाली करायचे असते. असो.) इयत्ता चौथीला केलेले वृक्षारोपण (त्यासाठी नाश्ता फ्री मिळणार होता. शिवाय शाळाही चुकणार होती.) आणि इयत्ता नववीला क्रांतिदिनाच्या दिवशी काढलेली प्रभात फेरी (ती रविवारी व पहाटे आठ वाजता असली तरी कंपल्सरी होती.) याखेरीज अथक परिश्रमांनंतरही काहीच बसले नाही. त्या सेक्शनमध्ये अॅडीशन करण्यास मी डेस्परेट आहे. (एक)
मिस. मधूला प्रपोज केल्यानंतर "ठरवलेली एक साधी गोष्ट करता येत नाही तर लग्नानंतर काय करणार? एनी वे, मी दुर्लक्षितांना पोसायचा मक्ता घेतला नाही." असे उत्तर देऊन नाकावर टिच्चून ती परागबरोबर निघून गेली व माझ्या निजलेल्या स्वाभिमानाने उचल खाल्ली. (दोन)
दुखावलेला स्वाभिमान हा जरी एक मोटिव्हेशन फॅक्टर असला तरी प्रस्तावना आत्ताच लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे सुरुवात न झालेल्या प्रोजेक्टचा प्रोजेक्ट रिपोर्ट दोन दिवसांत सबमिट करायचा आहे, आणि अशा क्रीटीकल वेळीच माणसाला किडे करायची हुक्की येते. (तीन)

तर मराठी वांङ्मयात अनमोल भर टाकण्याचे पवित्र कार्य हाती घेताना मी इन्स्पिरेशन सोर्स म्हणून पुलंचं गोळाबेरीज पॅडखाली घेतलं आहे. कोण जाणे एखाद्या सहृद प्रकाशकाने उद्या मानवतेच्या भावनेतून (किंवा वशिल्याने) माझे पुस्तक छापायचं ठरवलं तर प्रस्तावानेपासून तयारी करायला नको! (तशीही माझ्या पुस्तकाला माझ्याशिवाय कोण प्रस्तावना लिहिणार म्हणा. मीच नाव बदलून लिहीन म्हणतोय.) तूर्तास उत्तम प्रस्तावना देऊन प्रकाशकावर इम्प्रेशन कसे मारावे, शितावरून भाताची तशी प्रस्तावनेवरून पुस्तकाची परीक्षा कशी करावी ह्या टॉपिक्सना हात घालत नाही. (अन्यथा माझ्या पुस्तकातला एक चाप्टर फुकटचा कमी होईल.)

आणखी एक मला पडलेला यक्षप्रश्न म्हणजे कोणत्या नावाने लेखन करावे? एकटाच असल्यामुळे 'आग्रज' किंवा 'अनुज'ने संपणारी नावे ऑलरेडी बाद होतात. शिवाय बाबांनी मला वेळच्या वेळी मारून सुतासारखं सरळ केल्याने सुताने संपणारं नाव वापरण्याचं धाडस होत नाही. त्यामुळे 'केशवसुत'सम नावेही बाद होतात. मित्रांमधले माझे टोपणनाव पब्लिकली डिक्लेअर करण्यासारखं गोंडस नाही. म्हणून तूर्तास पाळण्यातल्या नावानेच लिहित आहे. (खरं सांगायचं तर दुसरं सुचलंच नाही.) आपल्या सूचना व प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत. स्तुतीपर प्रतिक्रिया भावी पुस्तकात छापून आणण्याची मी हमी देत आहे. स्तुती करणाऱ्या लकी वाचकाला पुस्तकाची एक प्रत फ्री मिळेल याची ग्वाही देतो आणि प्रस्तावना सुरू करतो.

लोभ असावा.

आपला नम्र,

निखिल अनिल जोशी
८-१०-२००६
पुणे

Tuesday, March 15, 2011

उनाड रात्र जत्रेची

शोधग्रामाच्या आदिवासी जत्रेत 'चहा, नाश्ता, जेवण वाटप समिती'चा प्रमुख या नात्याने खूप काम करून रात्री दहाला परतलो तेव्हा धन्य धन्य वाटत होते. चार-सहा गोंडी भाषेतले नवे शब्द शिकलो; अजिबात न दमता, काहीच तक्रार न करता प्रचंड काम केलं याचं मनापासून समाधान वाटत होतं. पण आता मात्र खूप थकवा जाणवत होता. कमीत कमी पाठ टेकू शकेल एवढ्या जागेचा डोळे मनापासून शोध घेत होते. कॉट तर दिसली, पण तिच्यावर झोपण्यासाठी सारा पसारा उकरून काढावा लागणार होता. शेवटी मनाचा हिय्या करून कॉटवरचा ढीगारा जसाच्या तसा उचलून खुर्चीत टाकला, त्यातून उशी शोधून डोक्याशी ठेवली, आधीच विस्कटलेली चादर नीट झटकून घेतली, सकाळी ६.३० ला उठण्यासाठी एक आलार्म आणि तीन रिमाईंडर्स लावले, आता दिवे बंद करणार एवढ्यात तुषार भाऊंचा फोन आला. 'फुलबोडीची ३०- ३५ माणसं जेवायला येत आहेत, ताबडतोब मेसमध्ये वाढायला ये.' कसची झोप आणि कसचं काय. हातातली झटकलेली चादर विस्कटून मी पुन्हा मेसला गेलो.

मेसमध्ये जाउन पाहतोय तर निर्वाणीची परिस्थिती! आता कोणी जेवायला येत नाही म्हणून विमल ताईंनी सगळी उरलेली भाजी टाकून दिली होती. दिवसभर स्वयंपाक करून त्याही वैतागल्या होत्या. ती परिस्थिती पाहून मी निर्णय घेतला, 'त्यांना पुन्हा स्वयंपाक करायला लावायचा नाही.' उरलेलं वरण आणि उरलेला भात ३५ जणांना सहज पुरेल असा माझा अंदाज होता.

"हॅत, एवढं वरण पाच जणाना बी न्हाई पुरून राह्यलं. आनि पाव्हन्यांना काय असलं मुळमुळीत खायला घालातो का भाऊ? ते काही नाही, विमल, बेसन बनव." - कौसाल्याताई

एका वाक्यात त्यांनी माझ्या कॉमन सेन्सचे पार धिंडवडे उडवून टाकले. नुसतं बोलून त्या थांबल्या नाहीत तर टमाटे, कांदे चिरायला घेतले, बेसन भिजवलं. एका चुलीवर बेसन बनवण्याचा प्रोग्राम सुरू झाला. भात पण कमी पडेल असं वाटलं (Of course त्यांनाच), म्हणून दुसरी चूल पेटवून त्यावर भात शिजवायचं ठरलं. सगळेच काम करत होते आणि मी ढीम्मपणे पाहत उभा होतो. मलाच माझी लाज वाटली. मी चूल पेटवण्यासाठी आगकाडी शोधायचे ठरवले.

“आगकाडी काह्यले शोधून राहिला भाऊ? त्या बेसनाच्या चुलीत लाकडं जळून राहिली ना, त्यातलंच उचल येक आणि पेटव दुसरी चूल.” - परत कौसल्याताई. परत माझ्या कॉमन सेन्सच्या पार चिंध्या चिंध्या.

हा सगळा प्रकार सुरू असताना अचानक फुलबोडीची ३५-४० मंडळी दत्त म्हणून समोर उभी ठाकली. अजून बेसनचा काहीच पत्ता नव्हता.

“आल्याआल्या काह्यले जेवन करून राह्यले? एक मस्त ढोल प्रोग्राम होऊन जाऊ द्यात. मी आलोच कॅमेरा घेऊन." तुषार भाउंनी त्यांना कॅमेराचं अमिष दाखवून नाचायला पाठवलं आणि कशीबशी वेळ मारून नेली.

परिस्थिती मोठी आणीबाणीची! मी परत आपलं डोकं लावलं. म्हटलं बेसन-भात होईपर्यंत पत्रावळ्या मांडून ठेवू, म्हणजे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच वाढता येईल. मी पत्रावळ्या मांडायला सुरुवात केली.

“ए भाऊ, तुले काय समजतं की नाय? पत्रावळ्या लावून ठेवलेस तर लोक जेवायला येणार न्हाईत का? अजून बेसन बनायले बहु टाईम हाय. इतग्यात नको लाऊ.” - परत कौसल्याताई. मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. मी मोठं डोकं लावून काहीतरी innovative करावं आणि ६वी यत्ता शिकलेल्या बाईने ते वारंवार चूक सिद्ध करावं! मला माझ्यावरच हसू यायला लागले.

“ए भाऊ, तू काह्यले काम करून राह्यला? गप बस ना येथी. काम करायला आम्ही हौ ना?” कौसल्या ताईनी मला बसवलं आणि माझी ragging घ्यायला सुरुवात केली. “जत्रेमधी पोट्टी बघायची का तुले?” कौसल्या ताईंसोबत आनंद काका, सुजाता ताई, विमल ताई यांनीही माझी बिनपाण्याची सुरू केली. तेवढ्यात फुलबोडीची काही मंडळी चुलीवर ढोल गरम करायला व मांजऱ्याला भात लावण्यासाठी आली आणि मी सुटलो.

भात-बेसन झाले तोपर्यंत फुलबोडीच्या मंडळींचा रेला नाच ऐन रंगात आला होता. 'आता डानस संपल्याशिवाय कसचे जेवायला येतात' म्हणून आमची मंडळी त्यांचा 'डानस' पहायला गेली.

ही आदिवासी मंडळी पण मोठी दर्दी. पोटात अन्नाचा एक कण नसतानाही रात्र रात्र सहज नाचून काढतील. फक्त तरुणच नाही तर म्हाताऱ्या बाया आणि पोरंसुद्धा. त्यांच्या डान्समध्ये हळुहळू मी कसा विरघळत गेलो ते माझे मलाच कळले नाही. ती मंडळी उपाशी पोटी बेधुंदपणे, पण खूप सुंदर, तालबद्ध नाचत होती. सर्व अशिक्षित स्त्रिया पुरूष एकमेकांच्या हातात हात घालून आमच्यासमोर मोकळेपणाने नाचत होते. त्यांच्या मनात कोणतीही 'सुशिक्षित' भीड नव्हती. सर्वांनी एकमेकांचे हात धरून गोल केला होता. मध्ये मांजऱ्या व ढोल वाजवणारे होते. त्यांनी असा काही ठेका धरला होता की एखाद्या लंगड्यालाही नाचण्याची उर्मी यावी. फक्त पुढेमागे करताकरता त्यांची पावले इतकी सुंदर, सफ़ाईदारपणे थिरकत होती की एखाद्या सुप्रसिद्ध नृत्यांगनेलाही त्यांचा हेवा वाटावा. नाचता नाचता त्यांचे तार साप्तकातले, पण तरीही गोड वाटेल असं संथ, एकसुरात गाणं सुरू होतं. त्यांच्यातल्या सामान्यातल्या सामान्य स्त्री-पुरुषांना सूर-तालाचे असामान्य जन्मजात ज्ञान होतं. कितीही जवळून निरीक्षण केले, त्यांच्या स्टेप्सना मात्रांच्या हिशोबात बसवण्याचा प्रयत्न केला, पण मला मात्र ते त्यांच्यासारखं नाचायला जमेना. माझ्यासारख्या शहऱ्याला जे मिळवण्यासाठी कित्येक वर्षांची तपश्चर्या कारावी लागेल, ते त्यांना आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. आपल्या कलेचा त्यांना कसलाही गर्व नव्हता. जत्रेत नाचून त्यांना एक दमडीही मिळणार नव्हती, पण नाचता नाचता ते लाखमोलाचा आनंद लुटत होते.

सर्व काही असं सुरळीत सुरू असताना अचानक एक मांजरीवाला गोलातून बाहेर आला. त्याने हळूच मांजरी उतरवली. झटका आल्यासारखे केले आणि आपला शर्ट फाडून टाकला. त्याने लोटांगण घातले आणि त्याच अवस्थेत नाचणाऱ्या मंडळींभोवती तो गोल फिरू लागला, उड्या मारू लागला, इकडेतिकडे सैरभैर पळू लागला आणि मग मॉं दंतेश्वरीच्या देवळात निघून गेला. मी स्तब्ध झालो. काय चाललंय ते मला काहीच कळेना. पण मंडळी जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात नाचत होती. काही कौतुकाने त्याच्याकडे बघत होती. थोडीफार चौकशी केल्यावर कळलं की तो एक पुजारी असून त्याच्या अंगात नाचता नाचता देव आला होता. त्याचे जे चाळे चालले होते ते तो करत नसून त्याच्यामधला देव करत होता. आता तो लोखंडी सळीने स्वतःला टोचूनही घेणार होता, रक्तबंबाळही होणार होता, झाडांवरही चढणार होता; पण एवढं करूनही काही वेदना झाल्या तर त्या त्याला होणार नव्हत्या, तर त्याच्यातल्या देवाला होणार होत्या. त्यामुळे त्याच्या बेबंदशाहीला कोणताच लगाम नव्हता. थोड्या वेळाने त्याच्यातला देव उतरून हळुहळू बाकीच्या नाचणाऱ्या पुजाऱ्यांच्या अंगातही शिरणार होता. शेवटच्या पुजाऱ्यातला शेवटचा देव उतरेपर्यंत मंडळी नाचणार होती.

या सर्व गदारोळात ज्यासाठी सर्व अट्टाहास केला होता ते भात-बेसन मात्र मंडळीची वाट बघत हळुहळू थंड होत होतं. अंगातला देव गेल्याशिवाय मंडळी भात-बेसनाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत हे लक्षात आल्यावर मी हळूच तेथून काढता पाय घेतला. घरी जाऊन पडलो तरी खूप वेळ कानामध्ये ढोल-मांजरीचे आवाज घुमत होते.


निखिल अनिल जोशी
गडचिरोली
१०-३-२०११

Sunday, July 11, 2010

सायकल

माझ्या सायकलबद्दल एवढ्या लोकांची एवढी मतं असतील असं मला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. माझ्या आजुबाजूच्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा पार दृष्टीकोनच एवढ्या एका खरेदीमुळे बदलून गेला. काही तुरळक अपवाद वगळता बहुतेकांच्या नजरेतून माझी 'इज्जत' पार 'डाउन' झाली. सुरुवात झाली ती रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडून. रोज मला बघून अपंग असल्याचा आव आणणाऱ्या आणि गयावया करणाऱ्या भिकाऱ्याने त्या दिवशी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. सुरुवातीला बरं वाटलं. म्हटलं चला, सुंठेवाचून खोकला गेला. पण थोडा 'लॉंगटर्म' विचार केल्यावर लक्षात आलं की आपल्याला भाव देणारा एकमेव घटकही आपल्याला 'इग्नोर' करू लागलाय. माणसाचं मन फार विचित्र असतं. एखादी गोष्ट त्याच्याजवळ असते तोपर्यंत त्याला तिचं महत्व त्याच्या लक्षात येत नाही. माझंही काहीसं असंच झालं होतं. ऑफिसला पोहोचल्यावर तर कहरच झाला. एकाच हापिसात असून जे मला ८--१० महिने कधीच भेटले नाहीत, ते सगळे आवर्जून भेटायला आले. बहुतेकांनी सहानुभूती व्यक्त केली. काहींनी उगीचच आजकालच्या आयुष्यात केवढा ताणतणाव आहे आणि सायकॅट्रीस्टकडे जाण्याची कशी गरज निर्माण झाली आहे हे पटवून दिलं. काहींनी 'बघू हे वेड किती दिवस टिकतय' असं उघडउघड चॅलेंज दिलं. आमच्या हापिसातली एकमेव मुलगी, आतातरी ती माझ्याशी बोलेल असं वाटलं होतं. पण तिनं नुसताच माझ्या वाढलेल्या पोटाकडे 'तिरपा कटाक्ष' टाकला आणि कुत्सितपणे हसत निघून गेली. सगळ्यांसमोर घोर अपमान झाला. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. माझा नेहमी हसतखेळत असणारा मित्र भलताच गंभीर झाला. त्याने मला माझ्या 'अविचारी' कृतीचं कारण विचारलं. मी खुष झालो. पहिल्यांदा माझी बाजू मांडण्याचा चान्स मिळाला होता. मी पाठ करून आणलेली बडबड सुरू केली. "आज ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न बिकट ...". क्षणार्धात त्याचा गंभीर भाव दूर होऊन आपण हापिसात असल्याची काहीही तमा न बाळगता तो जोरजोरात हसू लागला. मला गर्लफ्रेंड मिळण्याचे उरलेसुरले 'चान्सेसही' संपल्याचे त्याने 'डिक्लेअर' करून टाकले.

मी हापिसात कसाबसा दिवस काढला. परत निघताना सायकल काढायला गेलो तर टायर पंक्चर! हापिसाताल्याच कार्ट्याचं हे काम असणार यात मला काहीच शंका नव्हती. मी शाळेत केलेली पापं मला अशी ८ वर्षांनंतर फेडावी लागतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. चेहऱ्यावर उसने 'स्माईल' आणून काही झालंच नाही असं दाखवत, इकडेतिकडे बघत गुणगुणत ढकलगाडी सुरू केली. मागून काही जणांचा हसण्याचा आवाज आला, पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. बरीचशी पायपीट केल्यानंतर कोपऱ्यात एकावर एक 'टायरी' रचून ठेवलेल्या दिसल्या. खाली बुट्टीत पाणी होतं. संजीवनी सापडल्याच्या आनंदाने मी तिकडे गेलो तर पंक्चरवालाच कुठं दिसेना. बरीच शोधाशोध केल्यानंतर तो टायरींमागे झोपल्याचे लक्षात आले. त्या कुंभकर्णाला उठवेपर्यंत मला झोप यायला लागली. एक डोळा उघडूनच त्याने 'सिर्फ बाईकका होता, सायकल का पंक्चर नही होता' एवढे बोलण्याचे कष्ट घेतले आणि उघडलेला डोळा परत मिटला. शेवटी खूप गयावया केल्यानंतर त्याला माझी दया आली. उठून त्या बुट्टीतलेच पाणी त्याने तोंडावर मारले. 'पांच मिनिट ठेहरो' असे बोलून तो जो तिथून गेला तो वीसेक मिनिटांनी इराणी चाय पिऊन एका हातात बीडी आणि दुसऱ्या हातात चैनी-खैनी घेऊन आला. शेवटी कसाबसा मुहूर्त लागला. पंक्चर निघालं. 'कितना हुआ?' असं विचारल्यावर 'तीस रुपया' म्हणाला. 'बेगमपेट में तो दस रूपायो में होता है"... मी आपला उगीचच अंधारात खडा मारला. 'नाईट को एक्स्ट्रा चार्ज लागता', त्याचं सणसणीत उत्तर. 'लेकिन मै तो श्याम को आया था, आपका चाय खतम होने तक रात हो गयी ये क्या मेरी गलती है?', माझा शेवटचा केविलवाणा प्रयत्न. 'देखो भैया, यहा पे ऐसा ही होता. हम लोग आप को थोडी बुलाते? पैसा बचाना तो बेगमपेट में क्यू नही जाते'? माझी प्रतिकारशक्ती संपली. तीस रुपये देऊन मी खाली मान घालून निघालो. मागून कोणाचा तरी आवाज आला. 'कैसे कैसे लोगा आते. खालीपिली नींद खराब करते और पैसा भी नही देते'. अर्थात मी तिकडे लक्ष दिले नाही हे सांगायची गरज नसावीच. पुढे एका हार्डवेअर शॉपमध्ये गेलो. सायकलला मजबूत लॉक घ्यावं म्हणून दुकानदाराकडे साखळी मागितली तर 'किस चोर को आपकी सायकल चुराने के लिये टाईम होता' असा कुजकट शेरा मारून त्याने साखळी तोंडावर मारली. पण माझा हैदराबादचे प्रदुषण कमी करण्याचा निर्धार पक्का असल्यामुळे असल्या शेऱ्यांना मी भीक घालणार नव्हतो.

मी घरी पोहोचेपर्यंत आमच्या मातोश्रींनी ही बातमी ब्रॉडकास्ट करून टाकली होती. एक एक करून समस्त मावशीवृन्दांचे फोन सुरू झाले. सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसला होता. बाईक घेण्यासाठी पैसे पाहिजेत का अशी विचारणा होऊ लागली. बाळ पैसे कमावू लागलंय, तुम्ही काळजी करू नका हे समजावून सांगता सांगता माझ्या नाकी नऊ आले. बाबांना पटवून देताना तर तारांबळ उडाली. सायाकालामुळे वाईट इम्प्रेशन पडून प्रमोशन मिळताना अडचण येईल असं त्यांचं म्हणणं होतं. मोठमोठ्या कंपन्यांचे म्यानेजर हल्ली सायकल घेऊन येतात असे सांगितल्यावर म्हणाले 'आधी आपली कार सगळ्यांना दिसली पाहिजे आणि मग नंतर सायकल घेऊन गेलं की कसा स्टेटस वाढतो... तुझं आपलं कशात काही नाही आणि मोठा आलाय मॅनेजर'. शेवटी मी पांढरं निशाण दाखवलं आणि वैतागून मोबाईल स्विच्ड ऑफ करून टाकला.

त्या दिवसापासून माझी सायकल आमच्या अपार्टमेंटच्या पार्किंगची शोभा वाढवत आहे. पण आजही तिचं वजन वाढलं नाही हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. (धूळ बसल्यामुळे वाढणारे वजन चाकातून कमी होणाऱ्या हवेमुळे मेन्टेन्ड आहे :) ). समस्त पर्यावरणवादी होतकरू तरूणांना माझा असा सल्ला आहे की त्यांनी सायकलच्या नादी न लागता पायी चालूनच प्रदूषणावर नियंत्रण मिळवावे. सायकलच्या मार्गावर टायर पंक्चर होणे हे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यांतून जाण्याएवढे स्वच्छ आणि स्पष्ट आहे.

प्रेरणा: उपास, बटाट्याची चाळ - पु. ल. देशपांडे

-----------------------------------------------------------------------------------

मी सायकलवरून मारलेली हुसैनसागरला मारलेली चक्कर:

(माझी डार्लिंग, सायकल)


(राजभवन मार्ग, हैदराबाद, भल्या पहाटे)


(एक सुंदर मंदिर)


(शेवटी बुद्ध हसला)


(टँकबंड)



- निखिल अनिल जोशी
१२-०७-२०१०
हैदराबाद

Saturday, January 2, 2010

हैड्राबादनामा: बस पहावी धरून १

आमच्या हैदराबादच्या लोकांचे अनेक गोड गैरसमज आहेत. त्यांना मनापासून वाटतं की हैदराबादचे अत्याधुनिक बस स्टॉप्स म्हणजे पेन्शनारांसाठी बांधलेली विश्रांतिगृहे, रिकामटेकड्या लोकांसाठी बनवलेले पिकनिक स्पॉट्स किंवा प्रेमी युगुलांसाठी बांधलेली meditation centres असावेत. दिवसभर निरनिराळ्या समाजघटकांकडून असा पुरेपूर वापर झाल्यानंतर रात्री ते भिकारी, फेरीवाले, 'विविध' प्रकारचे लघुउद्योजक यांचा संसार थाटण्यासाठी उपलब्ध होतात. तर सांगायचा मुद्दा असा की, खरा हैदराबादी (विश्वास ठेवा, एवढ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण न होऊ शकणारे लोकही हैदराबाद मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात) बसची वाट बघत बसस्टॉपवर शांतपणे पेपर वाचत उभा आहे असे दृश्य दिसल्यास आपले गाव चुकले याची खात्री बाळगावी. आयडिअल केसमध्ये उतारू रस्त्याच्या पहिल्या लेनमध्ये दाटीवाटीने उभे राहतात. त्यांच्या अशा समजूतदारपणामुळे बस ड्रायव्हरचे लेन बदलून बस डावीकडे घेण्याचे कष्ट वाचतात. हां, आता दोन्ही लेन ब्लॉक झाल्यामुळे थोडसं ट्रॅफीक जॅम, मागच्या गाड्यांचं कर्णकर्कश विव्हळण, मग प्रेमाचे दोन-चार संवाद अशी थोडीशी किंमत द्यावी लागते, पण लोकांच्या आणि ड्रायव्हरच्या सोयीपुढे ती नगण्य असते. आता तर ओतप्रत भरलेली उपजत बुद्धीसंपदा आणि हळव्या मनाला हेलकावणारी सामाजिक जाणीव यांच्या जोरावर समस्त ड्रायव्हर बंधूंनी यावरही एकमताने उपाय शोधून काढला आहे. दुसर्‍या लेनमध्ये बस थांबवून मागच्यांचा खोळंबा करण्यापेक्षा ते बसचा वेग किन्चितसा कमी करतात. यामुळे बहुमूल्य वेळ आणि खर्चिक इंधन यांची बचत तर होतेच, शिवाय पळत पळत बस पकडावी लागत असल्यामुळे तेवढाच व्यायाम होऊन आज सबंध हैदराबादच्या आरोग्यपातळीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. बसमधील प्रवासी म्हणजे साक्षात मानवतेचा निर्झर!!! पाच ते दहा जण सतत बसच्या दरवाजातील पायर्‍यावर उभे असतात. आत येऊ इच्छिणार्‍यांना हात देणं एवढच त्यांचं काम. या माणुसकीच्या कामामुळे त्याना कधीकधी तिकीटही माफ केले जाते. कंडक्टरने तिकीट विचारताच ते नम्रपणे चालत्या बसमधून अलगदसे रस्त्यावर उतरतात आणि मागून येणार्‍या चालत्या बसमध्ये एखाद्या कारागिराच्या कुशलतेने चढतात. तिकडे त्याना हात दिला जातो आणि माणुसकीची परतफेड होते. असं ऐकण्यात येतय की हैदराबाद मॉडेलचे घवघवीत यश पाहता संपूर्ण भारतात हीच व्यवस्था राबवण्याचा सरकार विचार करत आहे.

मीही एकदा भारावून जाऊन चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला होता. पण एका हातात दरवाजातल्या माणसाचा हात, एका हातात खिडकीचा गज आणि दोन्ही पाय हवेत असा चित्तथरारक प्रवास केल्यानंतर गपचूप भरल्या पीतांबरासाहित पांढरपेश्या रिक्षात बसलो. तुकारामबुवा हसून म्हणाले, 'तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचे, येरागबाळाचे काय काम".