Wednesday, March 8, 2017

पुस्तक परिचय: ही एकादश सेवावी – विनोबा

पूर्वप्रसिद्धी- सीमोल्लंघन, सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१४

११ सप्टेंबर हा विनोबांचा जन्मदिन तर २ ऑक्टोबर गांधींचा. गांधींचा विचार पुढे नेण्यात कदाचित विनोबांचे सर्वात मोठे योगदान. या ११ सप्टेंबरला नायानांनी शोधग्रामच्या कार्यकर्त्यांना एक सुंदर कल्पना सुचवली. विनोबांचे कोणतेही एक पुस्तक वाचून त्याचे आपल्या मनात उमटलेले तरंग सर्वांनी लिहायचे. या हस्तलिखिताचे प्रकाशन २ ऑक्टोबरला. तब्बल ३० जणांनी छोटे-मोठे लेख दिले. यातील निखिल जोशीने ‘ही एकादश सेवावी’ या पुस्तकाचा करून दिलेला परिचय...

सामाजिक क्षेत्रात काम करताना problem solving attitude अधिक महत्त्वाचा की आत्मशुद्धीची प्रक्रिया?
हा प्रश्न कोणाला का बरे पडावा?

मी सर्चमध्ये आलो त्यादरम्यान problem solving attitude पेक्षा आत्मशुद्धीच्या प्रक्रियेकडे माझा अधिक कल होता. निसर्गाबद्दल खूप जीवापाड तळमळ वाटत असल्याने आपली जीवनशैली अधिकाधिक नैसर्गिक कशी करता येईल यासाठी खूप प्रयत्न करायचो. मग इमारत कितीही उंच असली तरी वीज वाचवण्यासाठी lift ऐवजी जिने वापरणे, कितीही गर्मी असली तरी कूलर न वापरणे, घरातील बाईक न वापरता public transport / सायकल वापरणे, प्लास्टिक टाळण्यासाठी बिस्कीटे / चिप्स / चॉकलेट्स खायचे सोडून देणे, हॉटेलला जाणे बंद करणे, सकाळी उठल्यावर चहा पिल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून चहावरचे अवलंबन टाळण्यासाठी चहा बंद करणे, स्वावलंबनाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतः स्वयंपाक करणे - शेतीचे प्रयोग करणे, खादी वापरणे, कचरा जाळला जाऊ नये म्हणून रोज जास्तीचे श्रमदान करणे, पाईपलाईन दुरुस्तीचे काम मजुरांकडून करून न घेता स्वतः मित्रांसोबत करणे असे अनेक प्रयोग अतुल-अश्विन-सिंधू-केदार-वैभव-वेंकी यांच्यासोबत वेगवेगळया वेळी केले. मात्र हा मार्ग कठीण होता. आत्मशुद्धी हे ध्येय असले तरी output कडे लक्ष जायचे. आपल्या संकल्पांचे significant output दिसायचेच नाही. आपल्याला पाहून खूप जणांचे वर्तन बदलले – लोकांच्या गरजा कमी होऊन माणसाचा निसर्गावरचा भार कमी झाला असे मुळीच दिसले नाही. आपल्याच निश्चयापासून घसरण्याची सतत भीती होती. तशातच माझ्या सर्चमधील मुख्य कामाचे output देखील विशेष येत नव्हते. आपल्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून भलताच हट्ट आपण धरून बसतो आहोत असे वाटू लागले. यथावकाश नैसर्गिक जीवनशैलीबद्दल विशेष आस्था असणारी सर्चमधील मित्रमंडळी हळुहळू सर्च सोडून गेली. याच वेळी अमृत, सुजय, विक्रम यांची जीवनशैलीचा प्रमाणाबाहेर बाऊ न करता problem सोडवण्याची जबरदस्त वृत्ती खूप आकर्षित करू लागली. ‘आपण काय करतो’ (input) पेक्षा ‘काय फलित निघाले’ (output) हे महत्त्वाचे असल्याचे पटू लागले.

आत्मशुद्धी’वरील श्रद्धा हळुहळू कमी होऊन ‘problem solving’वरील श्रद्धा वाढू लागली. विचारांतील एक खूप मोठा अडसर दूर झाला. चक्रे फिरू लागली, कामे होऊ लागली, output येऊ लागलं. पूर्वी छटाकभर कामाला खूप वेळ लावणाऱ्या मला इतकी कामे येऊ लागली (त्यातली अनेक मी स्वतःहून ओढवून घेऊ लागलो.) की दिवसभर काम केले तरी वेळ कमी पडायचा. Weekdays weekends यांच्यातील फरक जाणवेनासा झाला. कामे घेण्याची व पूर्ण करण्याची नशा चढू लागली. हा मार्ग आपल्याला उपयुक्त ठरत आहे हे समजल्यावर हळुहळू ‘आत्मशुद्धी’च्या मार्गाकडे दुर्लक्ष व प्रसंगी हेटाळणी होऊ लागली. शरीरश्रम बंद झाले. कचरा जळताना दिसला तर अस्वस्थ वाटेनासे झाले (‘छोट्या छोट्या किती गोष्टींची काळजी करत बसणार?’). दिवसा दिवे चालू दिसले तरी ते बंद करण्याचे कष्टच घेईनासा झालो. हळुहळू चहा व बिस्कीटाने मागील दाराने माझ्या आयुष्यात पुन्हा प्रवेश केला. एखाद्या व्यसनमुक्त माणासाच्या आयुष्यात दारूची सवय relapse व्हावी त्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांताला चहा व बिस्किटांचा अनुशेष मी व्याजासकट भरून काढला. रोज एका ठराविक वेळी canteen ला जाण्याची ओढ वाटू लागली. सामूहिक प्याज कचोरी, रसगुल्ले, चिवडा, चहा यांची ओढ वाटू लागली. एखादा दिवस सामूहिक खाण्याचा कार्यक्रम झाला नाही तर कसेसे वाटू लागले. कामावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला. वर गेलेला कामाचा आलेख पुन्हा खाली येऊ लागला. खाण्या-पिण्यात, फिरण्यात-फोटो काढण्यात मजा यायची. पण घरी तणावात असणाऱ्या आईला फोन करायला वेळच मिळायचा नाही. काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले.

अशातच ‘गांधी’ चित्रपट पाहण्यात आला. ‘आत्मकथा’ही वाचू लागलो. गांधींचा मार्ग आत्मशुद्धीचा होता. मात्र केवळ संन्यासी बनून न राहता त्यांनी इतरांच्या आयुष्यातल्या समस्या सोडवल्या. ‘आत्मशुद्धी’विना ‘problem solvingचा मार्ग स्वीकारला तर गाडी भरकटते आणि Problem solving विना आत्मशुद्धीचा मार्ग अवलंबणे फारच कठीण, खडतर असा माझा अनुभव आहे. येथे आत्मशुद्धी problem solving च्या विरोधात नसून दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. (वरवर द्वैत वाटणाऱ्या दोन गोष्टींमध्ये अद्वैत शोधणे ही विनोबांचीच देणगी!). एक निर्गुण तर तर दुसरे सगुण. आत्मशुद्धीची भरकटलेली गाडी पुन्हा मार्गावर आणण्यासाठी विनोबांचे ‘ही एकादश सेवावी’ वाचायला घेतले.

आम्ही सध्या जी प्रार्थना म्हणतो –
अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह
शरीरश्रम आस्वाद सर्वत्र भयवर्जन
सर्वधर्मीं समानत्व स्वदेशी स्पर्शभावना
ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रत-निश्चये

या अकरा व्रतांमध्ये अनिंदा हे व्रत जोडून प्रत्येक व्रताबद्द्ल विस्ताराने विनोबांनी लिहिले आहे. गांधींच्या ‘मंगल प्रभात’चा हा विस्तार. ही व्रते काही गांधी / विनोबांनी पहिल्यांदा सुरू केली नाहीत. यातली अनेक व्रते जैन, बौद्ध इ. धर्मांत खूप पूर्वीपासून आहेत. ही व्रते साधू-संन्याशांसाठी आहेत असे मानले जाई. मात्र व्यावहारिक, सांसारिक काम करणाऱ्यांसाठीदेखील या व्रतांची आवश्यकता असल्याचे गांधींनी सांगितले. ही गांधींची सर्वात मोठी देणगी असल्याचे विनोबा म्हणतात.

अहिंसा-सत्य इ. शब्द ऐकायला छान वाटतात. अगदी मुन्नाभाई सुद्धा ‘बापूजीके पास अंग्रेजो के खिलाफ अहिंसा और सत्य ये हत्यार थे’ असं बोलून जातो. पण त्यांचा अर्थ काय? शारीरिक हिंसा न करणे व खरे बोलणे म्हणजेच अहिंसा आणि सत्य का? प्रत्येक व्रताचे सूक्ष्म व सखोल चिंतन विनोबांनी या पुस्तकात केले आहे. उदा. अहिंसेबद्दल त्यांची अनेक वाक्ये हळुहळू आपले डोळे लख्ख उघडत जातात...
· बचावाची हिंसा आणि उठावाची हिंसा या दोन्ही प्रकारच्या हिंसेपासून निवृत्त होणे हा या व्रताचा अर्थ आहे.
· हिंसा देहाची शक्ती आहे. अहिंसा आत्म्याची शक्ती आहे, आणि आत्मा मरत नाही.
· आपली अहिंसेची शक्ती वाढवायची असेल तर ‘कोणाला भ्यायचे नाही आणि कोणाला भिववायचे नाही’ असे व्रत घ्यावेच लागेल.
· दंडशक्तीच्या आधारे मी एखादी गोष्ट लादेन तर ते चुकीचे ठरेल. ज्ञानशक्तीच्या आधारे एखादी गोष्ट लादणेही चुकीचे ठरेल. उपवास वगैरे तपस्येच्या शक्तीने ती लादणेही गैर ठरेल. उपवास करावेत ते चित्तशुद्धीसाठी, आत्मपरीक्षणासाठी, आत्मचिंतनासाठी किंवा संकल्प बळ वाढवण्यासाठी.
· अहिंसेचा एक अंश आहे प्रेम, आणि दुसरा अंश आहे करुणा. प्रेमाचा अर्थ आहे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे आणि करूणेचा अर्थ आहे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे.
· आपल्यावर जे प्रेम करतात, त्यांच्यावर आपण प्रेम करतो. हे तर जनावरेही करतात. कोणी आपला द्वेष करत असला तरी त्याच्यावरही प्रेम करावे. तेंव्हा शक्ती वाढते.
· शत्रूवर प्रेम करणे ही सहजसाध्य गोष्ट नाही. द्वेष तेथे सहज आहे, म्हणून तेथे प्रेमाचा प्रकाश जास्तच हवा.
· रागाने दुसऱ्याला मारणे म्हणजे हिंसा, आणि रागाने उपोषण करणे म्हणजे अहिंसा, असे नाही. अहिंसा केवळ बाह्य क्रिया नाही. ती हृदयाची निष्ठा आहे.
· अहिंसा म्हणजे विनाशाच्या कामात भाग न घेणे, एवढेच नव्हे. रचनात्मक कामांमध्ये तन्मय होणे हे अहिंसेचे मुख्य रूप आहे.

· अनिंदा व्रत तसे अहिंसेचे अंगच आहे. परंतु त्याची एवढी आवश्यकता आहे की ते स्वतंत्र व्रतच असले पाहिजे. वाणीत निंदा नसणे एवढाच मर्यादित या व्रताचा अर्थ नाही. हृदयशुद्धी तेव्हाच साधेल, जेव्हा गुणग्रहण होईल. इतरांचे दोष पाहूच नयेत, गुणच पाहावेत.

यातल्या अनेक विचारांशी गीता प्रवचनांच्या रोजच्या वाचनाच्या वेळी ओळख झाली होती. कठीण परीक्षेच्या काळात शांत आणि खंबीर राहण्यासाठी या विचारांनी मला खूप साथ दिली. ‘गुणग्रहणाच्या’ विचाराने तर माझ्या दृष्टीकोनात खूप सकारात्मक बदल झाले आहेत. सर्चमधील चार वर्षाच्या काळात माझी खूप वाढ झाली. मात्र अनेकदा न पटणाऱ्याही गोष्टी घडल्या. मात्र हळुहळू सर्वांवर प्रेम करायला शिकलो, सर्वांच्यातले गुण पहायला शिकलो. न पटणाऱ्या गोष्टींवर प्रेमाने तोडगा काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे माझा समतोल टिकून राहायला अनेकदा मदत झाली.

आत्मशुद्धी म्हणजे केवळ बाह्य वर्तनबदल नव्हे, तर हृदयशुद्धीसाठी आपली वृत्तीदेखील बदलत नेणे असे मला पुस्तक वाचताना जाणवले. उंच डोंगराच्या अंधाऱ्या घाटात वळणावळणाने जात असताना अचानक एखाद्या वळणावर लख्ख सूर्य दिसावा अशी अनेक वाक्ये या पुस्तकात आपल्याला येऊन धडकतात. आपल्याला विचार करायला भाग पाडतात. एकाच व्रताबद्दल अनेक वेळा वाचले तर नवा अर्थ लागत जातो.

फोटोग्राफीमध्ये frame composition बद्दल एक तत्त्व वाचले होते. ‘सामान्यपणे फोटोच्या फ्रेममध्ये अधिकाधिक गोष्टी याव्यात म्हणून आपण प्रयत्न करत असतो. मात्र मुख्य गोष्ट सोडून जेव्हा अधिकाधिक गोष्टी आपण फ्रेममधून काढून टाकतो तेव्हाच फोटो सुंदर बनतो.’ हे फोटोग्राफीचे तत्त्व आपल्या आयुष्यालाही अगदी चपखल बसते. आपल्या ध्येयाच्या आड आपल्या इच्छा, आकांक्षा, वासना, लहरी इ. गोष्टी येऊ नयेत यासाठी – आपल्या आयुष्याचा फोटो अधिक सुंदर करण्यासाठी – हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.

निखिल जोशी

No comments:

Post a Comment