Tuesday, April 14, 2009

पहाटधारा




कोऱ्या नभात माझ्या, तो कृष्णमेघ शिरला
सचैल मनातून भिजलो, मन श्रीमंत मग वाटले

कोण्या पहाटरात्री गेली दरवळोनि रातराणी
इतुके भरुन आले, नयनी दवबिंदु दाटले

नभी मेघ पिंजलेले, मृद् गंध दाटलेला
पर्जन्य स्वागतासी, स्वर्गात देव नटले

ते बिंब उगवता लाल, स्वच्छंद घनांच्या मागे
मेघांतुनी कवडसे जणु अंकूर बिजांतुनि फुटले

अतृप्त पाहता माती, संपृक्त जाहले मेघ
गुंफून ठेवलेले, मोती अखेर तुटले

ते इंद्र्धनुष लोभस, राजस न रंग त्याचे
वेड्या नभावरी मग, ते ॠण धरेचे फिटले

ती गोड भैरवी होती, मल्हार बरसला त्यात
शून्यात मी बुडालो, डोळे क्षणात मिटले


-निखिल अनिल जोशी

5 comments:

  1. निखिल, तुझ्या कविता दिवसेंदिवस बहारदार होत आहेत.
    खूप भावली ही कविता...

    ReplyDelete
  2. पूर्ण कविता समजली नाही ... :( ...पण मस्त आहे

    ReplyDelete
  3. खुपच छान...आवडली मला कविता......
    सहज म्हणुन विचारतो...तु बोरकरांच्या कविता वाचल्या आहेस का?
    कारण सचैल, संपृक्त हे शब्द वाचुन त्यांचीच आठवण होते.

    ReplyDelete
  4. @ All
    Thank you very much!!!

    @ मयुरेश,

    माझं वाचन खूपच तोकडं आहे. मला बोरकरांची शाळेतली ’माझ्या गोव्याच्या भूमीत’ एवढी एकच कविता आठवते. पण मला काही Blogs माहित आहेत ज्यावर बोरकरांच्या कविता publish केल्या आहेत. मी आता तरी त्या नक्की वाचेन.

    ReplyDelete
  5. आज परत एकदा वाचनात आली ही कविता, आणि परत एकदा वेडा झालो...

    ReplyDelete