Thursday, May 19, 2011

गर्वहरण

कालपटाच्या पत्रिकेत आज शनी दाटला होता
आजचा दिवस जरा ग्रीष्माने ग्रासला होता

का कोणास ठाऊक,
पण पहाटेचा प्रसन्न भास्कर आज जरा जास्तच गडद दिसला होता
इतक्या दिवसांचा अहंकार का वळीवाच्या चाहूलीने त्रासला होता?

त्याला वेळेचेही भान नव्हते, अन् दयेला तर मुळीच स्थान नव्हते
रक्ताचा श्वेत अन् श्वेताचा पीत कधी झाला ते कळलेच नाही
सर्वांना तडपवताना स्वतःही जळतोय हे तर त्याला वळलेच नाही

धरादेखील त्याच्या ह्या वागण्याने त्रस्त होत होती
रक्ताला जागून मात्र त्याच्याबरोबर हतबलपणे तप्त होत होती

पण त्याला त्याची पर्वा नव्हती, त्याचे पित्त खवळले होते
गर्वाने मान काढली होती, अन् अहंकारी रक्त उसळले होते

कवितेत शोभणारे त्याचे प्रखर तेज आता 'काटे'कोरपणे टोचू लागले होते
क्षणागणिक वाढणारे त्याचे भीषण तांडव बेधुंद होऊन नाचू लागले होते

नारायणच जर उग्र असे तर व्यथा कुणाला सांगावी?
बिथरलेल्या मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधावी?

...

कोण जाणे क्षितीजातून ते दैवी ढग कसे आले
धगधगत्या त्या बाणांचे मग क्षणात कवडसे कसे झाले?

मेघांतून जलधाराही झिरपू लागल्या, दोघांचे अहंकार एकमेकांना भेटले
क्षणभर इंद्रधनुष्याचा भास, नंतर मात्र धर्मयुद्ध पेटले

अहो अस्तित्वाची लढाई ती, मागे कुणीच सरेना
त्यांचा सुरू झाला लपंडाव, बिचाऱ्या नभाला मात्र वाली मिळेना

इतका वेळ दबा धरून बसलेली चपला गर्जना करीत मेघाला मिळाली
संध्याकाळच्या सूर्याच्या ओसरत्या तेजाचीही आयतीच मदत त्याला झाली

मेघाची सरशी मान्य करण्याखेरीज सूर्याकडे काही गत्यंतरच नव्हते
पांढरं निशाण दाखवावं तर ढगांमध्येही अंतर नव्हते

.......

एका यःकश्चित सायंकाळी निसर्गाला अशी महाकाव्ये स्फुरतात
भल्याभल्या महाभूतांचीही तेंव्हा सहज गर्वहरणे घडतात


-निखिल अनिल जोशी
२००६
पुणे

5 comments:

  1. Too good a poem!!! avadli :)
    Keep it up.........

    ReplyDelete
  2. Bhari kavita ahe hi... punha ekada avadali.... :) Ayala kharach nisargachya manaat asa kahi yet asel ka ?

    ReplyDelete
  3. shevaTachyaa 2 oLeennaa kaDaaDUn TaaLee.

    ReplyDelete
  4. Dhanyawad... Pittu, Swandya, Shankya...

    ReplyDelete